Palghar News : पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन फाईन सायन्सेस लिमिटेड कंपनीत वायू गळती झाल्याने 11 कामगारांना त्याची बाधा झाली. कंपनीत डायमिथाईल सल्फेटची गळती झाल्याने कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रसायनाच्या धुरामुळे जवळील काही कामगारांना डोळे चुरचुरणे, जळजळ यांसारखा त्रास सुरू झाला. सुरुवातीस दोन ऑपरेटरना प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर एकूण 11 कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी बोईसर येथील विकास नेत्रालय या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अबू बकर (वय 30), केतन म्हात्रे (वय 45), नरेंद्र ठाकूर (वय 33), अभिषेक देव (वय 28), मंगल यादव (वय 47), सुनील पाटील (वय 29), मनीष यादव (वय 20), जितेंद्र चौधरी (वय 36), मनीष कुमार (वय 20)आशिष देशमुख वय (वय 31), विजय पाल (वय 28) अशी या वायु गळतीमुळे वायूची बाधा झालेल्या कामगारांची नावे आहेत.
घटनेची माहिती रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास प्रशासनाला मिळाली. त्यानंतर पोलीस आणि औद्योगिक आरोग्य संचलनालय अधिकाऱ्यांनी वायुगळती झालेल्या कंपनीत भेट देत पाहणी केली. त्याचप्रमाणे बाधित कामगारांची देखील भेट घेतली. या घटनेची प्राथमिक चौकशी सहाय्यक संचालक एस. जी. सब्बन यांनी केली असून याप्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे.
