Solapur Fire Breaks out at Towel Factory : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर असलेल्या एमआयडीसीत पहाटे एका टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीवर तब्बल पंधरा तासानंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
सेंट्रल हॅण्डलूम टॉवेल कारखान्यात संपूर्ण कुटुंब आगीत भस्म झाले आहे. सोलापूरच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वात भयावह घटना असल्याची माहिती नागरिकांनी दिली. बाबा मिस्त्री पुढे म्हणाले, कारखाना मालक हाजी उस्मान मंसुरी हे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूम मधील बाथरूममध्ये जाऊन लपले होते. दीड वर्षाचा नातू युसुफ याला काही होऊ नये, यासाठी त्यांनी मिठीत कवटाळून घेतले होते. मात्र भीषण आगीत उस्मान आहे त्या स्थितीत होरपळून मृत पावले. अनस मंसुरी आणि शिफा मंसुरी यांचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे.
आठ जणांचा होरपळून मृत्यू
रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सेंट्रल हॅण्डलूम टॉवेल इंडस्ट्रीज कारखान्याला आग लागली होती. सकाळच्या सुमारास कारखान्यातील कामगार महताब सैदुसाब बागवान(वय 55 वर्ष),सलमान महताब बागवान(30 वर्षे) हिना वसीम शेख(35 वर्षे) या तीन कामगारांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले होते. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती दिली. पंधरा तासांच्या रेस्क्यूनंतर सांयकाळी कामगार आशाबानो महताब बागवान (वय 50 वर्षे) कारखान्याचे मालक हाजी उस्मान मंसुरी (वय 77 वर्ष), अनस मंसुरी (वय 25 वर्षे) शिफा मंसुरी (वय 20 वर्षे) आणि दीड वर्षीय बाळ युसूफ मंसुरी यांचे शव बाहेर काढण्यात आले.

