• Mon. Jun 29th, 2026

    अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर, सांगलीला मोठा फटका

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर, सांगलीला मोठा फटका

    कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसत असल्यामुळे कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या भूमिकेवर सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील अंकली पुलाजवळ उदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले, ज्यात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास अलमट्टी येथे जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

    सतेज पाटील (फोटो– Lipi)

    कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला 2005, 2019 आणि 2021 साली महापुराचा मोठा फटका बसला. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने आणि पंचगंगा तसेच कृष्णा नदीचे पाणी अलमट्टी धरण येथे अडवल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. असं असताना देखील कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची आणखी ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा घाट घातला आहे. कर्नाटकच्या या भूमिकेविरोधात आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन पुकारलं असून कोल्हापुरातील अंकली पुलाजवळ उदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर अलमट्टीपर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

    सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या गावांसह अन्य गावांना आलमट्टी धरणाच्या ५१९ मीटर उंचीमुळे महापुराचा फटका बसला असताना कर्नाटक शासनाने आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याचा घाट घातला आहे. या धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर तसेच कराडपर्यंत संपूर्ण गावे पूरग्रस्त बनणार आहेत. यामुळे अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी अंकली पुलाजवळ आज सर्वपक्षीय नेत्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजप,काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशन यांच्यासह इतर पक्षही सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या चक्काजाम आंदोलनात कर्नाटक सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर तीव्र नाराजी दर्शवत जोरदार टीका करण्यात आली. आलमट्टीची उंचीवाढीचा निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा एल्गार यावेळी करण्यात आला.

    तब्बल 3 तास चाललेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक आंदोलकांनी अडकल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर दुसऱ्या बाजूला सर्वाधिक महापुराचा फटका बसणारा शिरोळ तालुक्यात कडकडीत बंद ठेवून या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

    “कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाबाबतची भूमिका घेतली आहे. त्याविरोधात आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. राज्य शासनाने घोषणा न करता निर्णायक भूमिका घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. राज्य शासनाने 21 तारखेला बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. राज्य सरकारने केंद्राकडे भूमिका मांडावी, जेणेकरून आम्हाला पुराचा धोका उद्भवणार नाही. जर असं झालं नाही तर अलमट्टी इथं जाऊन आंदोलन करण्याची तयारी केलेली आम्ही केलेली आहे. या संदर्भात निर्णय घ्यावा. अलमट्टीच्या उंचीवाढीला जी आता स्थगिती आहे ती केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याने घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे सरकार किती खरं बोलतं आणि किती खोटं बोलतं हे या बैठकीतून समोर येईलच,” अशी भूमिका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मांडली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed