• Sun. Jun 21st, 2026

    चिंचपोकळीत खरंच चिंच मिळायचे का? असं पडलं स्टेशनचं नाव

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    चिंचपोकळीत खरंच चिंच मिळायचे का? असं पडलं स्टेशनचं नाव

    chinchpokli Station Name History- मुंबईतील मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी स्थानक असून मुंबईतील प्रत्येक स्थानकांच्या नावाप्रमाणेच या स्थानकाच्या नावाचाही रंजक इतिहास आहे. जाणून घेऊया याबद्दल

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मुंबईतील मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी स्थानक. मुंबईतील प्रत्येक स्थानकांच्या नावाप्रमाणेच या स्थानकाच्या नावाचाही रंजक इतिहास आहे. मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी स्थानकावर मध्य रेल्वेच्या स्लो ट्रेन्स थांबतात.मुंबई शहरातील हे स्थानक गिरणगावाला जोडले गेले आहे. या स्थानकाच्या नावाचा इतिहास हा चिंचेंशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया याबद्दल

    चिंचपोकळी हे नाव कसं पडलं?
    1853 साली भारतात पहिल्यांदा रेल्वे धावली. मुंबई ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावली होती. त्यानंतर या मार्गा दरम्यान स्थानके बांधण्यास सुरू झाली.चिंचपोकळी स्थानक हे 1877 साली ब्रिटीशांनी बांधले. या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे होती तसेच पोफळी म्हणजे सुपारीची झाडे ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच या परिसराला चिंचपोकळी असे नाव पडले.

    प्लेग, कोरोना आणि चिचंपोकळी
    1896 साली प्लेगच्या रोगाने मुंबईत थैमान घातले होते. त्यावेळी चिंचपोकळी स्थानकावर प्लेगच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ज्यावेळी ट्रेन येत असे त्यावेळी प्रत्येक प्रवाश्याची चाचणी केली जात असे. जर व्यक्तीला प्लेगची लागण झालेली असेल तर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात होते. जेथे साथीच्या रुग्णावर उपचार केले जात होते. ते रुग्णालय आजचे कस्तुरबा रुग्णालय. कोरोनाच्या काळातही कस्तुरबा रुग्णालयाचे योगदान महत्त्वाचे होते.1926 पासून हे रुग्णालय मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहे.

    चिंचपोकळीची ओळख
    चिंचपोकळी भागात मोठया प्रमाणात गिरणी कामगारांची वस्ती होती. त्यामुळे या भागावर मराठी संस्कृतीचा विशेष ठसा आहे. या परिसरात वर्षानुवर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आगमनाधीश म्हणून ओळख आहे. लाखो गणेशभक्त चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला उपस्थित असतात. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली होती. चिंतामणीचे आगमन या परिसराची सांस्कृतिक ओळख झाली आहे. आता या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होताना दिसत आहे. एका बाजूला चाळी तर एका बाजूला उभ्या असलेल्या टोलेजंग इमारती येथे पाहायला मिळतात.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed