• Sat. Mar 7th, 2026

    Palghar News: रो-रो सेवेने वाचले नवजात बाळाचे प्राण; दीड तासांचा प्रवास १५ मिनिटांत झाल्याने वेळेत मिळाले उपचार

    Palghar News: रो-रो सेवेने वाचले नवजात बाळाचे प्राण; दीड तासांचा प्रवास १५ मिनिटांत झाल्याने वेळेत मिळाले उपचार

    Palghar News: उशिरा रेल्वे नसल्याने आणि रस्तेमार्गाने जाण्यास किमान दीड-दोन तास लागणार होते. त्यामुळे सफाळ्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जलसार ते वसई तालुक्यातील विरारजवळील नारंगी या रो-रो सेवेतून त्यांना विरारला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

    ro ro service (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, पालघर: एका अर्भकाचे प्राण धोक्यात आले होते… एक-एक मिनिट महत्त्वाचे होते. या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी त्याला मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. त्यासाठी रात्रीच्या वेळी रो-रो सेवेची विशेष फेरी चालविण्यात आली. त्यातून रुग्णवाहिका पलीकडे नेण्यात येऊन बाळाला मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात नेण्यात आले. त्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याला नवे जीवन लाभले आहे. डॉक्टरांचे प्रसंगावधान आणि तातडीने मदतीला धावलेली रो-रो सेवा यामुळे त्या बाळाला जीवदान मिळाले.

    सफाळे पश्चिम भागातील विराथन खुर्द येथील अस्मिता जाधव प्रसूतीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी दाखल झाल्या. त्यांनी बाळाला जन्म दिला. संध्याकाळी अचानक बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. ही बाब प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉ. शुभांगी सानप यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र आवश्यक व पुढील उपचारांसाठी बाळाला मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलवावे, अशी सूचना कुटुंबीयांना केली. त्याप्रमाणे कुटुंबीयांनी विरारला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र उशिरा रेल्वे नसल्याने आणि रस्तेमार्गाने जाण्यास किमान दीड-दोन तास लागणार होते. त्यामुळे सफाळ्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जलसार ते वसई तालुक्यातील विरारजवळील नारंगी या रो-रो सेवेतून त्यांना विरारला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
    Narayan Rane: सुप्रीम कोर्टाचा राणेंना दणका; पुण्यातील २९ एकर वनजमीन हस्तांतर ठरवले बेकायदा, प्रकरण काय?
    बाळाला वाचवण्यासाठी तातडीने गावचे उपसरपंच विकोष म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र तोपर्यंत रात्रीची शेवटची फेरी संपून रो-रो सेवा नारंगी येथे थांबवण्यात आली होती. उपसरपंच म्हात्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जेट्टीच्या व्यवस्थापकांना विनंती केली. त्यांनी ही फेरी बोट पुन्हा जलसार येथे मागवून घेतली. दहा मिनिटांतच फेरी बोट जलसारच्या जेट्टीकडे पोहोचली. याच दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातून या नवजात बाळाला घेऊन येणारी रुग्णवाहिकाही जेट्टीवर पोहोचली.
    मंत्रालयासाठी नवी सहइमारत! २० मंत्र्यांसाठी ११० कोटींचा खर्च, आधुनिक अन् सुसज्ज दालने
    रुग्णवाहिका बोटीत घेऊन बाळासह जाधव कुटुंब पंधरा मिनिटांच्या आत विरार येथील अभिनव रुग्णालयात पोहोचले. येथे प्राथमिक उपचारानंतर बाळाला मुंबईतील अंधेरी येथील कोकिळाबेन रुग्णालयात वेगाने पोहोचविण्यात आले. या नवजात बालकाच्या हृदयाच्या नलिका एकमेकांना उलटसुलट जोडल्या गेल्याने रक्तपुरवठा नीट होत नव्हता. त्यामुळे त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. मात्र कोकिळाबेन रुग्णालयात बाळावर उपचार सुरू असून बाळ सुखरूप आहे. विशेष रो-रो सेवेमुळे बाळाला जीवदान मिळाल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
    देशात साडेचार महिन्यांत ७५ वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात सर्वाधिक घटनांची नोंद, महाराष्ट्रात काय स्थिती?
    बाळाला लाभले जीवन
    डॉक्टरांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि पालघर तालुक्यातील जलसार ते विरारजवळील नारंगी या तातडीने मदतीला धावलेल्या रो-रो सेवेमुळे बाळावर उपचार होऊ शकले. या बाळावर शस्त्रक्रिया पार पडली असून, त्याला नवे जीवन लाभले आहे, अशी भावना त्या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed