मंत्री संजय शिरसाट यांच्या आरोपांवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. लाडक्या बहिणींना पैसे मिळायला हवे, पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचे आहे, असं रामदास आठवले स्पष्ट म्हणाले आहेत. या संदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
रामदास आठवले यांना यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे. आम्ही 2100 रुपये देऊ असं सांगितलं आहे. पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचे आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
‘खाते बंद केल्यास माझं मंत्रीपद जाईल’
संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागातून पैसे वळवल्यामुळे हे खातंच बंद करावं, अशी मागणी उद्विग्नपणे केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटते खाते बंद करायला नको, खाते बंद केल्यास माझं मंत्रीपद जाईल. निधी वळवू नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का?
यावेळी रामदास आठवले यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे की, आम्ही एकत्र येणार नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार आमच्यासोबत आल्यास आंनद आहे. आमची ताकद आणखी वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते शरद पवार माझे नेते आहेत. अजित पवार आम्हाला सोडणार नाहीत”, असं मत रामदास आठवले यांनी मांडलं.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील?
यावेळी रामदास आठवले यांनी ठाकरे बंधू एकत्र येतील का? या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील असे आम्हाला वाटत नाही. असे झाल्यास महायुतीमध्ये फूट होईल. काँग्रेस राज ठाकरे यांना मानत नाही. राज आणि उद्धव एकत्र आल्यास त्यांना फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
