Mumbai Couple Donate Money to Martyred Murli Naik : दुःखद वातावरणात, मुंबईतील एका जोडप्याने असे काही केले आहे जे शहीद मुरली नाईकच्या कुटुंबाचे फक्त दुःख कमी करणार नाही, परंतु त्यांचे शीर अभिमानाने आणखी उंचावेल असे काम केले आहे.
मुंबईतील एका जोडप्याने स्तुत्य काम करत देशासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी परदेश दौऱ्यासाठी साठवलेले १.०९ लाख रुपये शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला दान केले आहेत. ‘VRyuva’ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती देण्यात आली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या नियंत्रण रेषेवर शहीद झालेल्या मुरली नाईक यांच्या सन्मानार्थ या जोडप्याने हा निर्णय घेतला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, ‘मुलगा गमावल्यानंतर दुःखात बुडालेल्या कुटुंबाला त्यांच्या या निर्णयाने अभिमान वाटेल.’ या जोडप्याने त्यांची ओळख मात्र गुप्त ठेवली आहे.
मुरली नाईक यांचे मूळ गाव म्हणजे आंध्रप्रदेश. पण ते मुंबईतील घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे कुटुंबाची स्थिती खूप सामान्य आहे, त्याच्या आई-वडिलांनी मजुरी करुन संसाराचा डोलारा उभा केला. अलीकडेच एका पुर्नविकास प्रकल्पात त्यांचे घर गेल्याने त्यांचे कुटुंब आंध्रप्रदेशात परतले होते. मुलगा मुरली नाईक हा त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होता.
आपल्या मुलाला वीरमरण आल्याचे वृत्त समजताच मुरली यांचे वडील श्रीराम नाईक यांनी शोक व्यक्त केला. आणि आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचे म्हटले. १० मे ला मुरली नाईकचे पार्थिव जेव्हा त्यांच्या मूळगावी पोहोचले, तेव्हा हजारो लोकांची गर्दी जमली होती. २१ तोफांची सलामी शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.
दरम्यान, आंध्रप्रदेश सरकारने शहीद मुरली नाईक यांच्या पालकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय, त्याला पाच एकर जमीन, ३०० चौरस यार्डचे घर आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही मुरली यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

