• Tue. Jun 16th, 2026
    नागपुरात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा कहर, ६ वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये संताप

    Nagpur News : नागपूर शहरातील वाडी परिसरातील दत्तवाडी भागात एका ६ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    (फोटो– Lipi)

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील वाडी परिसरातील दत्तवाडी भागात एका ६ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत आहेत.

    ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षा नगर भागात एपी फिटनेस जीमसमोर घडली आहे. स्वरूप विजय मेश्राम असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव असून, तो घराबाहेर खेळत असताना अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांनी स्वरूपला जबरदस्त ओरबडले आणि त्याच्या मानेवर खोल जखमा केल्या आहेत. या हल्ल्यात स्वरूप गंभीररित्या जखमी झाला आहे.
    Nandurbar News: हळदीत बॅण्डवर नाचताना कोसळला अन् काहीच वेळात… वीस वर्षांच्या तरुणाचा हादरवणारा अंत, नंदुरबार हळहळलं
    घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या भटक्या कुत्र्याला हाकलून लावत स्वरूपला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर, त्याच्या गंभीर प्रकृतीची जाणीव डॉक्टरांना झाल्यानंतर त्याला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, स्वरूपच्या मानेवर झालेल्या खोल जखमेमुळे त्याच्या स्नायूंना व नसाला गंभीर इजा झाली आहे, ज्याचा परिणाम मेंदूपर्यंत होण्याची शक्यता आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    दत्तवाडी परिसरात ही भटक्या कुत्र्यांचा हल्ल्याची तिसरी घटना असूनही, स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. कुत्र्यांचे लसीकरण, बंधकरण किंवा पुनर्वसन यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने, नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

    या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक घाबरत आहेत. स्थानिकांनी मनपा आणि पोलिस प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed