IND vs PAK 1971 War Marathi News : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळच्या ‘ब्लॅकआउट’च्या आठवणींना पुणेकरांनी उजाळा दिला. त्यावेळेस शहरात कडक निर्बंध होते, रात्री सायरन वाजल्यावर शुकशुकाट व्हायचा. घराघरात काळे पडदे लावले जात होते, लहान मुले भीतीने घाबरत होती. आता ५४ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुण्यात ‘मॉक ड्रिल’ होणार असल्याने नागरिकांमध्ये त्या वेळच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
‘मी १९७१मध्ये शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर राहत होतो. सकाळी आणि सायंकाळी ‘सायरन’ वाजत असे. सायंकाळचा सायरन वाजला, की शहर शांत व्हायचे. रात्रीच्या वेळी पोलिस फिरत असत. घरातील उजेड बाहेर जाऊ नये; म्हणून खिडक्यांवर काळा कागद लावला जात होता. शहरात किमान २५ दिवस अशी स्थिती होती,’ अशी आठवण जयकर ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल डॉ. शां. ग. महाजन (वय ९२) यांनी सांगितली.
Operation Sindoor: पिक्चर अभी बाकी हैं! ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या ट्वीटने सस्पेन्स वाढला
सुरुवातीला खिडक्यांना काळा कागद लावला जात होता. नंतर अनेकांनी काळे पडदे लावून घेतले. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असल्याने शहराभवती विमाने फिरणार का, अशी चर्चा नागरिक करीत असायचे. अंधार आणि पोलिसांच्या गस्तीमुळे लहान मुलांना भीती वाटत होती. रात्री आठ वाजता रेडिओवरील बातम्यांमधून युद्धाची माहिती मिळत होती. मात्र, भारत या युद्धात जिंकणार हा विश्वास नागरिकांमध्ये होता, असेही डॉ. महाजन यांनी सांगितले.
Pragati Jagdale : आम्ही मोदींच्या लेकी, वडिलांनी न्याय मिळवून दिला; डोळ्यादेखत कुंकू पुसलं गेलं, ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच रडू कोसळलं, प्रगती जगदाळेंच्या भावना
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री. द. महाजन (वय ९२ वर्षे) यांनीही त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. ‘दुसरे जागतिक महायुद्ध आणि १९७१मध्ये झालेले भारत- पाकिस्तान अशा दोन्ही युद्धांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा, या काळातील ‘ब्लॅक आउट’चा थरारक अनुभव घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तर जर्मनीच्या विमानांच्या फेऱ्या पुण्या-मुंबईपर्यंत झाल्याची नोंद आहे. त्या वेळी मी शाळेत होतो. आम्हाला घराच्या काचेच्या खिडक्यांना, दारांना काळे कागद लावण्याची सक्ती करण्यात आली होती. पुण्यात ब्रिटिशांचे लष्कराचे केंद्र असल्याने इथेही बॉम्ब पडणार, अशी लोकांनी भीती होती.
विमानातून फिरणाऱ्या सैनिकांना खाली शहर आहे, हे दिसू नये, यासाठी काळोख ठेवण्याचे आदेश होते. सन १९७१च्या युद्धावेळी मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. युद्धाची भीती सगळ्यांनाच होती; पण आधुनिक साधने आली होती. टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांमधून युद्धाची ताजी माहिती मिळत होती. सरकारकडून मिळत असलेल्या सूचनांनुसार नागरिक नियमांचे पालन करीत होते. रात्रीच्या संचारावर बंधने होती. युद्धातील घडामोडींवर लोकही कुतुहलाने बारीक लक्ष ठेवून होते. आज तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे युद्धनीतीही वेगळी आहे.

