Chondi Villagers : अहिल्यानगरमधील चोंडीत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. राज्यभरातील मंदिरांच्या विकासासाठीही निधी मंजूर करण्यात आला. मात्र, ज्या चोंडीत बैठक झाली, तेथील ग्रामस्थांनी एक खंत व्यक्त केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोरून मंत्र्यांचे ताफे जात असताना त्याकडे कुतूहलाने पाहणाऱ्या रामदास मोरे नावाच्या ग्रामस्थाला विचारले असता त्यांनी सांगितले की, अहिल्यादेवी यांच्यामुळे आमच्या गावात इतके मंत्री येत आहेत. त्याचा आम्हाला आनंद वाटतो. मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतके मंत्री आमच्याकडे येऊन सुद्धा आम्हाला या कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आमचा पाणी प्रश्न सुटावा अशी अपेक्षा रामदास मोरे या ग्रामस्थाने व्यक्त केली.
‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन, तर दुसरीकडे पाणी टंचाई
अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर त्याच पाणीदार अहिल्यानगर येथील चोंडी गावातील ग्रामस्थ पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असल्याने विरोधाभास दिसून आलं. दरम्यान, चोंडीच्या नागरिकांच्या या समस्येचं निराकारण होईल का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
