• Sat. Mar 7th, 2026

    Supriys Sule : ‘तोपर्यंत कुठलाही ड्रोन सर्व्हे होऊ नये’, पुरंदर विमानतळाच्या वादावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    Supriys Sule : ‘तोपर्यंत कुठलाही ड्रोन सर्व्हे होऊ नये’, पुरंदर विमानतळाच्या वादावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    Supriya Sule on Purandar Airport : पुण्यात पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. सर्वेक्षणासाठी गेलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल गुन्ह्यांबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारला सुप्रिया सुळे यांनी विनंती केली. शेतकऱ्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. तोपर्यंत कोणताही सर्व्हे होऊ नये, असेही सुळे म्हणाल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी गेलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. प्रशासनाच्या सर्वेक्षणावेळी पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले. मोठा गदारोळ झाला. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एसपींची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांची एसपींसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “काल मी कुंभारवळणला आले होते. दोन-तीन निर्णय यात आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून यात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी ती सरकारशी बोलेल. विजय शिवतारे, संजय जगताप, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे या सर्वांशी फोनवरून माझं बोलणं झालं आहे ते शेतकऱ्यांबरोबर आहेत. सहा मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासाठी भालेराव नावाचे वकील कोर्टात उभे आहेत. त्यांना आजच जामीन व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. ते कोणीही दहशतवादी नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    “सरकारने अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत भेटूया अशी कृती समितीला विनंती केली आहे. सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा. सर्व कृती समिती झाली की पुरंदर तालुक्यातील जे नेते आहेत, आम्ही सर्वजण पुरंदरवासीय म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहोत”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

    ‘महाराष्ट्र सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा’

    “देशातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही. पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेवटच्या शेतकऱ्याचं समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने कुठल्याही उपक्रमासाठी जमीन हस्तांतरण करू नये. मग तो पुरंदरचा एअरपोर्ट असू दे किंवा हवेलीचा रिंग रोड असू दे. राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे की, जे काही कराल ते लोकांना विश्वासात घ्या. शेतकऱ्यांचा मान-सन्मान करा. महाराष्ट्र सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. “कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकारने घेतली पाहिजे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    ‘तोपर्यंत कुठलाही ड्रोन कुठलाही सर्व्हे होऊ नये’

    “सरकारने दोन आठवडे दिले आहेत. त्यात कृती समिती बसेल. चर्चा करतील. त्यांच्या मागण्या किंवा विरोध जे काय असेल ते ठरवतील. ते महाराष्ट्र सरकारला कळवतील मग बघू काय होतंय. तोपर्यंत कुठलाही ड्रोन कुठलाही सर्व्हे होऊ नये. शेतकऱ्यांनी शांततेचा मार्ग घेतला आहे. सरकारनेही तो शब्द पाळावा”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. “शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत सविस्तर पोलीस अधिक्षकांशी चर्चा झाली आहे. त्याचा सर्व अभ्यास करून दोन-चार दिवसात पोलीस त्यातून मार्ग काढतील”, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed