VHP Reacted on Rahul Gandhi Remarks : अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात दिलेल्या मुलाखतीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भगवान राम यांना ‘पौराणिक व्यक्ति’ संबोधल्याने वाद निर्माण झाला असून, विश्व हिंदू परिषद (विहिप) यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
मिलिंद परांडे म्हणाले की, राहुल गांधींनी भारतीय इतिहासातील अनेक घटनांना पौराणिक कथा ठरवत प्रभू राम यांनाही केवळ पौराणिक पात्र म्हटले. हे वक्तव्य त्यांनी परदेशी भूमीवर केले असून, हिंदू धर्म, श्रद्धा आणि परंपरांचा त्यांनी घोर अपमान केला आहे. हिंदू समाजाच्या आस्थेच्या मूळाशी संबंधित असलेल्या प्रभू रामचंद्रांना ‘पौराणिक’ म्हणणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी…
ते पुढे म्हणाले की, ‘हे काही नवे नाही, २००७ मध्ये राम सेतु आंदोलनाच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करत प्रभू राम काल्पनिक असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची हिंदूविरोधी भूमिका सातत्याने दिसून येते.’ परांडे पुढे म्हणाले की, ‘जो भगवान रामाचा अपमान करतो, त्याचा नाश होतो. राहुल गांधी यांनाही याचा अनुभव येईल. सत्तेचा हव्यास ठेवणाऱ्यांना हिंदू समाजाने सत्तेत येऊ द्यावे असे वाटत नाही. त्यांच्या हेतूंमध्ये राष्ट्र, धर्म किंवा समाज हित नसेल तर त्यांचा विरोध करणे आवश्यक आहे.’ राहुल गांधींनी वेळोवेळी हिंदूविरोधी वक्तव्ये केली असून, त्यांचा हेतू हिंदू समाजाला दुय्यम ठरवण्याचा आहे, असेही परांडे म्हणाले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारांमध्ये धर्मनिष्ठ आणि राष्ट्रवादी विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले.
‘भारतातच जिहादी हिंसेची कब्र तयार होईल’
तसेच परांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या जिहादी हिंसेचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, ‘पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी त्यांचा धर्म विचारला गेला. यावरून हे स्पष्ट होते की आतंकवादाला धर्म नसतो ही संकल्पनाच चुकीची आहे.’ ते म्हणाले की, ‘जिहादी हिंसा हे हिंदू समाजावर नियोजित हल्ल्यांचे स्वरूप घेत आहे. मुसलमान समाजातील काही कट्टर प्रवृत्ती हिंसेद्वारे हिंदूंना घाबरवू शकतील, असा त्यांचा समज आहे. पण ही त्यांची मोठी चूक आहे. भारतातच जिहादी हिंसेची कब्र तयार होईल आणि हिंदू समाजच ती खोदेल.’
‘हिंदू समाजाने जातीपातीपलीकडे जाऊन एकत्र यावे’
परांडे यांनी केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य करताना म्हटले की, ‘संपूर्ण समाजाच्या सहमतीने ही जनगणना केली गेली तर त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. मात्र, विहिपचा स्पष्ट मत आहे की हिंदू समाजाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकत्र यावे.’ ते पुढे म्हणाले, ‘सरकारने अनेक मागण्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र विहिपचा मुख्य उद्देश हिंदू समाजात एकोपा, राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम आणि सांस्कृतिक जागर यावर केंद्रित आहे.’ विहिपने काँग्रेसच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदू समाजाला सजग राहण्याचे आणि आपल्या श्रद्धा-संस्कृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांना ठोस उत्तर देण्याचे आवाहन केले. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशातील धार्मिक भावना भडकण्याची शक्यता असून, विहिपने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

