Maharashtra Weather Forecast : राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांत ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बुलढाण्यात अवकाळीचा फटका
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी पाऊस, गारपिटीने नागरिकांची दैना उडाली. वीज कोसळून तीन गुरे ठार झाली. काही ठिकाणी लग्नसोहळ्यांनाही वादळाचा फटका बसला.
सी लिंकचा विस्तार, ५० ते १०० मीटरवर सीसीटीव्ही; पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांवर; कसा आहे मार्ग?
पिकांचं गारपिटीने नुकसान
वाशीम शहरासह रिसोडमध्ये सोमवारी दुपारी अवकाळी पावसासोबत गारपीट झाली. यात उन्हाळी मूग आणि भुईमुगाचे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील मोर्चापूर, गोंदापूर, सूरगाव, कान्हापूर, पवनारला गारपिटीचा फटका बसला.
उत्तर महाराष्ट्रात गारपीट
नाशिक जिल्ह्यात मनमाड, तर जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा तालुक्यांत सोमवारी गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला. काही भागांत कांद्याचे नुकसान झाले. मनमाड शहर व परिसरात सोमवारी दुपारी गारपीट झाली. वीस ते पंचवीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा पिकाला फटका बसला आहे.
Pune News : हवामानाची सूचना ७२ तासांपूर्वीच, पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ली डिटेक्शन सिस्टीम सुरू; पाऊस-पुराचं अचूक भाकीत वर्तवणार
मराठवाड्यात तडाखा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. अंगावर वीज कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होईल, असा अंदाज आहे.
मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारी वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यात वादळामुळे लग्न सोहळ्यात धांदल उडाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे मांडव पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गंगापूर तालुक्यातील लासूर बाजार समितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तिथे पावसामुळे धान्याची पोती भिजली. वाळूज-पंढरपूर भागात गारपीट झाली. या भागात मोठ्या आकाराच्या गारा पडल्या.
Pune News : मोकाट कुत्र्याचा हल्ला, सात वर्षांच्या चिमुकल्याचा जबडा फाडला; डोक्यावरुन मायेने हात फिरवण पडलं महागात
राज्यात दोन दिवसांत पावसाची शक्यता
या आठवड्याअखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, या काळात कोकण विभागात तापमानात किचिंत घट झाली आहे. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, सोमवारी आभाळ ढगाळ होते. मंगळवारी आणि बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत या दोन्ही दिवशी ‘यलो ॲलर्ट’ असून, राज्यात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
सांताक्रूझ येथे सोमवारी ३३.७, तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरणात येत्या दोन दिवसांमध्ये आर्द्रता आणखी वाढून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांना; तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत बुधवारपर्यंत ‘यलो ॲलर्ट’ आहे.
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ३८ अंशांच्या पुढे कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात ४० अंश किंवा अधिक तापमान नोंदले गेले.
Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी, गारपिटीचा तडाखा; पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, या शहरांत ‘यलो ॲलर्ट’
गारपिटीची शक्यता
छत्तीसगडवर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणारे आवर्ती चक्रीय वारे व अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारे प्रत्यावर्ती चक्रीय वारे अशा दोन्हींच्या संगमातून राज्यभरात गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याची माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. या प्रणालीमुळे अवकाळी पावसाचीही तीव्रता वाढली आहे. आर्द्रतेमुळे उकाड्याचे प्रमाण अधिक आहे. सध्याच्या वातावरणात उष्णतेच्या लाटेपासून केवळ महाराष्ट्रात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

