• Sat. Mar 14th, 2026
    मराठवाड्यात तापमानाचा कहर, छ.संभाजीनगरातील धरणांनी गाठला तळ; नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा

    Chhatrapati Sambhajinagar Water Scarcity : मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढताच नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढताच नागरिकांना पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा बसत आहेत. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मोठ्या धरणांत ४४ टक्के पाणीसाठा असून मध्यम प्रकल्प धरणांत ९ टक्के आणि लघु प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लघु प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

    मराठवाड्यात पाणी टंचाई वाढली असून बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. लहान-मोठ्या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मोठ्या शहरातही पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, परतूर, माजलगाव शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

    विभागातील मोठ्या ११ धरणांत ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ९.१२ टक्के, ७५१ लघु प्रकल्पात १९.९६ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६ टक्के आणि तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २७ प्रकल्पात ८९ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७९ प्रकल्पात ४३.८३ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे पाणी टंचाई वाढली आहे. एका लघु प्रकल्पावर १० ते १५ गावे अवलंबून आहेत. या प्रकल्पातून उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सध्या पाणी शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. गंगापूर, वैजापूर तालुक्यात पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्यामुळे उन्हाळी पिकांना फटका बसला आहे.

    पिण्याचे पाणी, उद्योग आणि सिंचनासाठी चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी ५७, सिद्धेश्वर ३३, माजलगाव १८, मांजरा ३२, उर्ध्व पेनगंगा ५१, निम्न तेरणा ५४, निम्न मनार ४७, विष्णुपुरी ३१, निम्न दुधना ३५ आणि सिना कोळेगाव २१ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत २८ टक्के पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात २१ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ३० टक्के, लातूर जिल्ह्यातील आठ प्रकल्पात २३ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात २८ टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पात ३० टक्के आणि परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, असे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

    जिल्ह्यात ठणठणाट

    जायकवाडी धरणात ४३ टक्के पाणीसाठा असला तरी वितरण व्यवस्था नसल्यामुळे पाणी टंचाई कायम आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पात पाणी नाही. लाहुकी १, टेंभापुरी ८२, ढेकू ६, कोल्ही ५२, नारंगी ३३, गिरिजा २८, अंबाडी २४, गडदगड २८, पूर्णा नेवपूर २६, अंजना पळशी ६३, शिवना टाकळी ३२, खेळणा १८ आणि अजिंठा अंधारी धरणात १३ टक्के पाणीसाठा आहे. ९८ लघु प्रकल्पांपैकी ३० लघु प्रकल्प पूर्ण कोरडे आहेत. इतर प्रकल्पातही जेमतेम पाणीसाठा उरला आहे.

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed