• Sat. Jun 13th, 2026
    पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

    Maharashtra Tourism Security Force: राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

    हायलाइट्स:

    • महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय
    • शाश्वत पर्यटन टिकवण्याचाही प्रयत्न
    • पर्यटकांसाठी गरजेला मार्गदर्शकाच्या भूमिकेत
    security force AI (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

    ‘राज्यातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश आहे. दोन ते चार मे २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी; तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत,’ असे देसाई म्हणाले. ‘पर्यटन पोलिस’ या संकल्पनेमुळे पर्यटनस्थळांवरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील, असे ते म्हणाले.
    शुभमंगल ‘सावधान’! लग्नसोहळ्यातील जेवणातून विषबाधा; २८९ वऱ्हाडींची प्रकृती बिघडली, एका चिमुकल्याचा मृत्यू
    प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
    दोन ते चार मे २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल ३१ ऑगस्ट २०२५पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अदा केला जाईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
    लाकूड, कोळसा नकोच! बेकऱ्या, रेस्टॉरंट, भट्ट्यांमध्ये ९ जुलैनंतर वापर न करण्याचे ‘एमपीसीबी’चे निर्देश
    ‘सुविधा उपलब्ध होतील’
    पर्यटन सुरक्षा दलामुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील, जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटनस्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाइन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील’, असे शंभूराज देसाई म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed