• Sat. Mar 7th, 2026

    Bhaskar Jadhav : मोठा ट्विस्ट! अजित पवार यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव सोबत, अनेकांच्या भुवया उंचावल्या

    Bhaskar Jadhav : मोठा ट्विस्ट! अजित पवार यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव सोबत, अनेकांच्या भुवया उंचावल्या

    Bhaskar Jadhav and Ajit Pawar : रत्नागिरी दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांनी या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. तसेच, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणातील कणखर नेते भास्कर जाधव हे आज चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अजित पवार हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्यासोबत दिसले. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहणी दौऱ्यावेळी भास्कर जाधव हे अजित पवारांसोबत बघायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वीच भास्कर जाधव कसबा इथे दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत हास्यविनोद सुद्धा केला.

    भास्कर जाधव यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुठला पक्ष म्हणून तिथे गेलो नव्हतो. आमच्या या भेटीचा वेगळा अर्थ लावू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत उत्तर दिलं.

    अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेवर भाष्य

    चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. “अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात की, या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो आशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही, राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही. संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ती भूमिका नाही. आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे. त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशांसाठी ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केलं. “15 वर्ष काँग्रेस बरोबर काम करत असताना आपण लोकसभा, विधानसभा एकत्रित लढवायचो. पण बाकीच्या निवडणुका जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे, काय केलं पाहिजे ते जिल्ह्याचे नेते ठरवायचे. तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहोत. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्यामुळे तुमचा गैरसमज करून घेऊ नका”, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed