Bhaskar Jadhav and Ajit Pawar : रत्नागिरी दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांनी या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. तसेच, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केले.
भास्कर जाधव यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुठला पक्ष म्हणून तिथे गेलो नव्हतो. आमच्या या भेटीचा वेगळा अर्थ लावू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत उत्तर दिलं.
अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेवर भाष्य
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. “अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात की, या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो आशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही, राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही. संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ती भूमिका नाही. आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे. त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशांसाठी ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केलं. “15 वर्ष काँग्रेस बरोबर काम करत असताना आपण लोकसभा, विधानसभा एकत्रित लढवायचो. पण बाकीच्या निवडणुका जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे, काय केलं पाहिजे ते जिल्ह्याचे नेते ठरवायचे. तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहोत. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्यामुळे तुमचा गैरसमज करून घेऊ नका”, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
