• Wed. Mar 11th, 2026

    अंधश्रद्धेचा कळस! पोटच्या गोळ्याला गरम खुरप्याच्या डागण्या; आजार बरा करण्यासाठी मेळघाटात अघोरी प्रकार

    अंधश्रद्धेचा कळस! पोटच्या गोळ्याला गरम खुरप्याच्या डागण्या; आजार बरा करण्यासाठी मेळघाटात अघोरी प्रकार

    Melghat Aghori Case: मेळघाटात दुर्गम गावांमध्ये आपले बाळ आजारी पडले, तर असे ‘डंबे’ म्हणजे डागण्या देण्याचा अघोरी प्रकार आजही सुरू आहे. यामुळे आजार बरा होतो, या अंधश्रद्धेवर कोरकू आदिवासी समाजाचा विश्वास आहे.

    aghori melghat (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : लहान लेकरे म्हणजे आईचा, कुटुंबाचा जीव. दोन-चार महिन्यांच्या आपल्या पोटच्या गोळ्याच्या पोटावर शेतात तण काढण्यासाठी वापरण्यात येणारे खुरपे लालबुंद तापवून कुणी चटके देईल का? पण मेळघाटात दुर्गम गावांमध्ये आपले बाळ आजारी पडले, तर असे ‘डंबे’ म्हणजे डागण्या देण्याचा अघोरी प्रकार आजही सुरू आहे. यामुळे आजार बरा होतो, या अंधश्रद्धेवर कोरकू आदिवासी समाजाचा विश्वास आहे.

    कुपोषण, बालमृत्यू याचा तिढा न सुटलेल्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मनातील अंधश्रद्धेची ही पाचर दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येथील ७२ गावांमध्ये रात्रंदिवस फिरून प्रबोधन केले. लोकांना अनेक प्रश्न विचारले. आजारी असलेल्या मुलांना डॉक्टरांकडे का नेत नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. पण अनेकांना त्याचे उत्तर देता आले नाही. आरोग्याच्या सेवा मिळत नसल्याने या गावातील लोकांच्या, लेकरांच्या करुण कहाण्या यावेळी पुढे आल्या. गावांतील शाळा, अंगणवाड्या, ग्रामस्थांच्या बैठकांमधून चिमुकल्या मुलांनी हात वरून करून झालेला त्रास सांगितला. पोटावरच्या डागाच्या खुणा दाखवल्या.
    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी
    आरोग्याच्या सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी तिथपर्यंत जाण्यासाठी आजही वाहतुकीच्या दळणवळणाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णालयामध्ये जाऊन प्रसूती करण्यापेक्षा घरीच प्रसूती केली जाते. येथे जाऊन प्रत्यक्ष या मोहिमेमध्ये काम केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी हृदय पिळवटून टाकणारे असे अनेक अनुभव सांगितले.

    सर्पदंश झाल्यानंतरही भगताकडे साप चावलेल्या व्यक्तीला नेण्यात येते. भगत तांदूळ फेकतो. त्यात तांदळाची संख्या विषम असेल, तर आजार बरा होतो, असे मानले जाते. सम असेल, तर ती व्यक्ती वाचणार नाही, असे सांगितले जाते. प्रबोधनाच्या वेळी विज्ञाननिष्ठ प्रयोग पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना यात हातचालाखी असल्याचे लक्षात आले.
    ठाकरेंच्या खासदार ‘बहिणी’चा फोन बंद पडला; तपासातून मोठा उलगडा; 12 लाखांची चोरी उघडकीस
    तहसीलदार विजय लोखंडे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. कार्यकर्त्यांनी अनेक चमत्काराचे प्रयोग दाखवले, त्यामागील हातचालाखी, विज्ञानाचे विश्लेषण केले. प्रबोधन केल्यानंतर त्यांनी मुलांकडून देवाकडून दुवा आणि डॉक्टरांकडून दवा म्हणजे औषध घ्यायचे, असे वदवून घेतले. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत असे प्रकार केल्यास शिक्षा होऊ शकते, हे त्यांना समजावून सांगितले. तेथील समाजबांधवांनी यापुढे असे प्रकार करणार नाही, मुले आजारी असताना डाग देणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली.

    एकमेका साथ देऊनंदिनी जाधव, श्रीकृष्ण धोटे, सागर बावणे, भगवान रणदिवे यांनी २२ दिवस मेळघाटात राहून ७२ गावांमध्ये ही मोहीम तळमळीने राबवली. सकाळपासून रात्रीपर्यंत हा संपूर्ण भाग पिंजून काढला. ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचीही तयारी दाखवली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता महापात्रा, बीडीओ शिवशंकर भारसाकळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed