• Sat. Mar 14th, 2026

    रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 26, 2025
    रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा – महासंवाद




    ??????????????

    मुंबई, दि. 26 : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवाद व भांडवलशाही यांचा सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार युवकांमध्ये पोहोचवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केली.

    पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात दिनांक 22 ते 25 एप्रिल 1965 या कालावधीत ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर व्याख्याने दिली होती. या व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, दीनदयाल शोध संस्थेचे सरचिटणीस अतुल जैन, सुरेश सोनी उपस्थित होते.

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या उपाध्याय यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले. तसेच सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्याला पुढे घेऊन जात आहेत. ग्रामीण भागात रस्ते, गरिबांना गॅस कनेक्शन, पेयजल या योजना त्याचाच परिपाक आहेत. कोरोना काळात पाश्चात्य देशांनी लस शोधली असती तर तिची किंमत जनतेच्या आवाक्यात राहिली नसती. मात्र, भारताने संपूर्ण देशवासियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली आणि त्यापलीकडे जाऊन अनेक देशांना मोफत लस उपलब्ध करुन दिली. हा सर्वसमावेशक विचार पंतप्रधान श्री. मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडूनच अंगिकारला आहे, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    ??????????????

    वास्तवाचे भान ठेवून अन्न वाया जाऊ देऊ नये, प्रत्येकाने धन अर्जन करावे परंतु अनावश्यक खर्च करू नये तसेच स्वतःसाठी न जगता इतरांसाठीही जगावे हा दीनदयाल उपाध्याय यांचा विचार स्वीकारला पाहिजे, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    0 0 0

     

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed