Ramdas Kadam on MNS-Shivsena Alliance : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केल्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिंदे गटातील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, राज ठाकरे त्यावेळी अध्यक्ष असते तर शिवसेनेचे तुकडे झाले नसते, असे म्हटले आहे. योगेश कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर स्वार्थी असल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरे त्या वेळेला अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते, शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया त्यांच्याकडे आहे ते पण वाघासारखे माणूस आहेत त्यांना वाघासारखी माणसं लागतात आणि उद्धव ठाकरे यांना सुभाष देसाई यांच्यासारखी माणसं लागतात शेळ्या मेंढ्या, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरे शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचे काम ते कधीही करणार नाहीत. उद्धव यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येणार नाहीत ते स्वाभिमानी आहेत. थोडक्यात सांगायचं तर राज ठाकरे यांच्यामध्ये महाराष्ट्र बाळासाहेबांना पाहतो आहे. राज ठाकरे यांनी आजच नाही तर मलाही एकदा सांगितलं होतं. बघा उद्धव यांना विचारून माझी तयारी आहे पण मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेच तयार नव्हते असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. त्यानंतर योगेश कदम यांनीही राज ठाकरेंना उद्धव यांना स्वार्थ साधुन झाल्यावर रक्ताची नाती नकोशी होतात, असं म्हणत अप्रत्यक्षपणे युती करण्यासाठी नकार दिला आहे.
स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की उद्धव ठाकरे यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणजी राणे, स्वर्गीय माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी, दिवाकरजी रावते, लीलाधरजी डाके, रामदासभाई कदम आणि एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको, असं म्हणत योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
