• Sun. Mar 15th, 2026

    Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात घरघर?

    Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात घरघर?

    Lipi | Updated: 20 Apr 2025, 8:52 pm

    Shiv Sena UBT News : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागला. अनेक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने, उरलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे गट आणि अजित पवार गट आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत आहेत. यामुळे रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला घरघर लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरून दखल न घेतल्याने निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अनेक माजी आमदारांनी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखासहित पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले. मात्र पक्षाच्या नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे लवकरच रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील उरल्यासुरल्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गटाकडे खेचण्याची तयारी चालू झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागला. केवळ गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये भास्कर जाधव यांचा अपवाद वगळता कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खिळखिळा करण्याचे उद्योग सत्ताधारी शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपकडून चालू आहेत. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

    विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे पडसाद ग्रामीण भागात ठाकरे गट कमकुवत होण्यामध्ये झाले. मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गटाने शिवसेने उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी आमदारांसह पराभूत उमेदवारांना व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांना सत्तेची गाजरे दाखवत, तसेच साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करत, राजकीय यंत्रणा हाताशी धरून कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम ग्रामीण भागातील तळागाळातील तालुका प्रमुख सहित शहर प्रमुख, विभाग प्रमुखासहित, शाखाप्रमुख आणि सामान्य शिवसैनिकांवर झाला. मात्र याची किंचित दखल मातोश्रीवरून घेण्यात आली नसल्याचे सामान्य शिवसैनिकांमधून बोलले जाते.

    नेमणुका पक्षाच्यावाढी ऐवजी खच्चीकरण करण्यास कारणीभूत?

    लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आता ग्रामीण भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने जिल्हाप्रमुखासह तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुखांच्या नियुक्त मातोश्रीवरून केल्या गेल्या. यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाल्याचे चित्र रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यात तर याचा मोठा परिणाम पाहण्यास मिळाला.

    रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. हे त्याचेच एक कारण असल्याचे बोलले जाते. यानंतर दक्षिण रायगडमध्ये ३० मे पर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागण्याची शक्यता निष्ठावंत शिवसैनिक बोलू लागले आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासहित सत्ताधारी भाजप यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रलोभने, पदांची आमिषे दाखवण्याचे काम या दोन्ही गटाकडून चालू असल्याने ३० मे पर्यंत रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    कोकणात संपर्क अभियान राबविणार!

    कोकणातील रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपर्क अभियान राबविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अभियानापूर्वीच कोकणातील शिवसैनिकांची मरगळ झटकून त्यांना आर्थिक ताकद, निष्ठावंत शिवसैनिकांची खंत काय आहे, जुन्या जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांचे सल्ले मातोश्रीवरून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ऐकले तरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सोपी होईल. अन्यथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेल्या पक्षाची वातहत रोखणे अशक्य असल्याचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून बोलले जात आहे.

    निष्ठावंत शिवसैनिक जागेवर असला तरी निष्ठावंत शिवसैनिकाकडे आर्थिक ताकद नसल्याने सत्ताधारी शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर लढण्यासाठी शिवसैनिकांकडे आर्थिक बळ नसल्याने निष्ठावंत शिवसैनिक खचला आहे. मात्र प्रलोभने मिळत असल्याने नेते मात्र पक्ष बदल करू लागले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची प्रक्रिया होणार का? ती जर लवकर झाली तरंच निष्ठावंत कसलेल्या शिवसैनिकाला खऱ्या अर्थाने ताकद मिळण्याचे काम होऊ शकते. मात्र तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षांतर करण्याची प्रक्रिया सत्ताधारी गटाकडून जोमाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed