• Sun. Mar 15th, 2026

    Ajit Pawar : ‘बुद्धीला योग्य वाटत असेल ते त्यांनी…’, राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Ajit Pawar : ‘बुद्धीला योग्य वाटत असेल ते त्यांनी…’, राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Edited byचेतन पाटील | Authored by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Apr 2025, 6:27 pm

    Raj Thackeray and Uddhav Thackeray News : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती न करण्याची अट घातली आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांनी सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण भांडण बाजूला सारुन महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. पण त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. राज ठाकरे यांनी भाजप आणि मनसेसोबत राजकीय मैत्री करु नये, अशी उद्धव ठाकरे यांची अट आहे. ही अट राज ठाकरे यांना मान्य असेल का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर वेगवेगळे दावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

    “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कुटुंबातील, एका परिवारातील आहेत. प्रत्येकाला वेगवेगळा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार असताना मनसे प्रमुख म्हणून स्वतः राज ठाकरे काम करत असतात. तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काम करत असतात. या नात्याने त्यांनी दोन पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी हा 100 टक्के त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मनसे आणि उबाठा या पक्षातील जे घटक आहेत. त्यांना वाटले असेल की ते दोघे एकत्र यावेत. ते एकत्र यावेत की न यावेत हे कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचे कारण नाही. माझे एकच मत आहे, की आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

    एकनाथ शिंदे नाराज? अजित पवार म्हणाले…

    एकनाथ शिंदे हे नाराजीतून दरे गावाला आले आहेत का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “एकनाथ शिंदे यांनी आता मी तीन दिवस गावी जाणार आहे, असे अमरावतीवरून येताना सांगितले आहे. त्यांचे एक स्वप्न आहे, की नवीन महाबळेश्वर बसवण्याचे. त्यावेळी पर्यावरणाचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. तेथे त्यांना नवे महाबळेश्वर बसवायचे आहे. त्यांनी शेतीतही लक्ष घातलेले आहे. प्रत्येकाला आपापल्या गावाकडे आल्यानंतर समाधान वाटत असते तशा पद्धतीने त्यांना वाटतं आणि मुद्दाम गावाला येऊन शांततेत काही गोष्टींचा विचार करता येतो. महत्त्वाचं लोकांना तेथे बोलावून त्यांना चर्चा करायची असेल, पक्ष वाढ, राज्याचे प्रश्न सोडवणे किंवा आणखीन काही त्यांच्या मनात असेल त्याची चर्चा करता येते म्हणून ते गावी आलेले असतील. ते सांगताना ते तीन दिवस गावाला जाणार असल्याचे सांगून आले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed