Ladki Bahin Yojana : राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी केवळ 500 रुपयांचा हफ्ता मिळणार आहे. त्यामागील कारणदेखील आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला जातोय.
संजय राऊतांचा निशाणा
“लाडक्या बहिणींनीच सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर आली आहे. ती उद्या शुन्य रुपयांवर येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षात या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“आमच म्हणणं आहे की, कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्राची योजना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थात काही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. हा लाभ मिळत नसेल तर दीड हजार रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ मिळवायचा ते निश्चित करण्याचं आपण आपल्या लाडक्या बहिणींवर सोपवलं आहे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अर्थराज्यमंत्र्यांचं देखील स्पष्टीकरण
राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “या योजनेच्या जीआरमधील कोणत्याही अटी सरकारने बदललेल्या नाहीत. त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जावून काही लोकांनी लाभ घेतला असेल, तसेच श्रीमंत घरातील महिलांनी लाभ घेतला असेल, तरीदेखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसूली केली नाही”, अशी प्रतिक्रिया आशिष जयस्वाल यांनी दिली.
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. “दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे”, असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं.