Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊत बहुजन समाजविरोधी मानसिकता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिल्याने राऊतांना चक्कर येईल, असेही ते म्हणाले. तसेच, फडणवीसांना ब्राह्मण म्हणून डिवचणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त Dr. Babasaheb Ambedkar’s 134th Birth Anniversary चंद्रकांत पाटील पुण्यातील आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
फुले चित्रपटावर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतल्यामुळे, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाची तारीख १५ दिवस पुढे ढकलली असून काही दृश्य व संवाद हटवण्यास सांगितले आहे. यावरून काही माध्यमांत ‘फडणवीस विरोधात फुले-आंबेडकर’ अशी मथळी झळकली. यावर पाटील म्हणाले, “मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यामुळे त्यांना ब्राह्मण म्हणून डिवचणं चुकीचं आहे.”
पुढे ते म्हणाले, “संजय राऊत बहुजन समाजविरोधी मानसिकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तो यशस्वी होणार नाही.” अमित शहा काल रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्याऐवजी संजय राऊत तीन दिवस फक्त टीका करत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले, “अमित शहा यांनी शिवाजी महाराजांवर ५०० पानी पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामुळे राऊतांना चक्कर यायची वेळ येईल.”
शेवटी चंद्रकांत पाटील म्हणाले, “तुम्ही सत्तेत नाही म्हणून इतका द्वेष का? दररोज तुमची माणसं तुमच्यापासून दूर जात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन उमेदवार मागावे लागत आहेत. पुण्यात तुमचं काय राहिलंय? ५ नगरसेवक भाजपात आले, मुंबईत ५७ नगरसेवक शिंदे गटात गेलेत. हे सगळं सोडून तुम्ही केवळ अमित शहा काय बोलले याकडे लक्ष देता आहात.”