Nitesh Rane Attack on Shivsena UBT : जवळपास चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना संगमेश्वर येथे जेवताना अटक झाली होती. या घटनेची मी परतफेड करणार असल्याचे नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गटाला आव्हान दिले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात जिल्हा प्रशासनाने नारायण राणे यांना अटक करण्याची तयारी केली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीच्या मिटिंग मधूनच मोबाईलद्वारे याच विषयासंदर्भात काही सूचना केल्याचा व्हिडिओही त्यावेळी व्हायरल झाला होता. राणे यांना जेवणाच्या ताटावरूनच अटक केल्याचा क्षण आजही आपण आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवला आहे. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली होती. जेवण करत असताना देखील अटक करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाग पाडलं होतं, याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी करुन दिली आहे. वडील नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.
राणे पुढे म्हणाले, ज्यादिवशी या क्षणाची परतफेड करेन, त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट मारणार, कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कुणीही सुटणार नाहीत,’ असं नितेश राणेंनी बोलून दाखवलं आहे. दहा वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला, पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिलं आहे. मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली, त्यामुळे ते सगळं जुनं पुसलं गेलं आहे. तिसऱ्या कोणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं, असं देखील नितशे राणेंनी म्हटलं आहे.