Eknath Shinde on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर सांगोला येथील कार्यक्रमात नाव न घेता निशाणा साधला. ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
“राजकारण खेळीमेळीने झालं पाहिजे. निवडणुकीपुरता राजकारण. निवडणूक झाली की राजकारण संपलं. मग लोकांसारखी आपण काम करायचं असतं. म्हणून तर मी हे 40 वर्षे केलं. म्हणून मी शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. ही भूमिका ठेवली म्हणून. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना केली की, माझ्याकडे कुणीही आलेला खाली हात जाता कामा नये. इथे देना बँक आहे, लेना बँक नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही आज एक टीम म्हणून काम करतोय. टीम म्हणून राज्याला पुढे नेतोय. राज्याला नंबर एक करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा-अकरा वर्षांपूर्वी देशाची विकासयात्रा सुरु केली. खऱ्या अर्थाने देशाचा विकास होताना पाहतोय. देशाचा डंका जगभरात पिटताना दिसतोय याचा अभिमान आपल्याला वाटतोय”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदेंकडून शहाजी बापूंचं कौतुक
एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी शहाजी बापू पाटील यांचं कौतुक करण्यात आलं. “शिवाजी बापू पाटील लढवय्या माणूस आहे. अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारुन उठतो. मदतीसाठी धावून जातो. तोच खरा शिवसैनिक असतो हा बाळासाहेबांचा मंत्र आहे. बापू भरोशाचा माणूस आहे. अडचणीच्या काळात धावून जातो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून शहाजी बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता. सगळेच ट्रेसमध्ये होते. तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठी ऑपरेशन करतो. त्यातील हे मोठं ऑपरेशन होतं. आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो पण बापू विनोद करायचे, गप्पा मारायचे. बापू सगळ्यांना हासवायचे. अख्ख्या गुवाहाटीचं पर्यटन व्यवसाय बापूंमुळे चौपट झाला. बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे. लोकांच्या सुख-दु:खात धावून जाणार आहे. आपल्या हातात काम घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत”, अशी स्तुती एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आमची सगळी माणसं सरळ आणि साधी आहेत. काही छक्के-पंजे नाहीत. पण काही लोकं दिसायला साधी असतात. दिसायला निष्पाप असतात. पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा अशी लोकं असतात. त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जावून इतके वर्ष फसलोय”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

