• Mon. Apr 14th, 2025 9:20:54 AM
    इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू, मुंबईहून वाराणसीला जाताना छ. संभाजीनगरात इमरजन्सी लँडिंग

    Indigo Flight Emergency Landing: मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे विमानाची इमरजन्सी लॅडिंग करावी लागली. गेल्या २० दिवसातील ती तिसरी घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगर: मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर विमानाचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ही महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या महिलेचे नाव सुशीला देवी होते. सुशीला देवी या मुंबईहून विमानात चढल्या होत्या. विमान प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि सीटवर बसल्या बसल्याच त्यांचा अचानक मृत्यू झाला.

    वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे ६ एप्रिलला रात्री १० वाजता विमान छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर उतरले. विमानतळावर वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

    अधिकाऱ्याने सांगितले की, एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनने आवश्यक ती कार्रवाई पूर्ण केली आणि विमान वाराणसीकडे पुन्हा रवाना करण्यात आले. तर महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

    गेल्या २० दिवसात इंडिगोच्या विमानात दोघांचा मृत्यू

    यापूर्वी पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. यावेळी विमानाचे लखनौमध्ये इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. प्रवाशासोबत त्याची पत्नी आणि जावई देखील होते.

    प्रोफेसर सतीश चंद्र बर्मन असे या प्रवाशाचे नाव असून ते आसाममधील नलबारी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 2163 मध्ये चढल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ते पत्नी कांचन आणि जावई केशव कुमार यांच्यासोबत प्रवास करत होते.

    त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर क्रू मेंबर्सनी याची माहिती पायलटला दिली. यानंतर लखनौ विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशाला तपासून मृत घोषित केले.

    पाणी प्यायला आणि बेशुद्ध झाला

    तर, २१ मार्चला सकाळी लखनौ विमानतळावर इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने आधी पाणी प्यायले, त्यानंतर सीटवर बसल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. विमानातून सर्व प्रवासी उतरले पण तो उठला नाही. यानंतर फ्लाइट क्रू मेंबर्सनी तात्काळ मेडिकल टीमला बोलावले. मात्र तोपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झाला होता. मृत आसिफ अन्सारी दौला हा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी होता. क्रू मेंबर्सनी वेळीच लक्ष दिले असते तर आसिफचा जीव वाचू शकला असता, असं प्रवाशांनी सांगितलं आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed