• Sat. Apr 26th, 2025 9:29:35 AM

    लेकीला हळद लागण्यापूर्वीच सारं संपलं, मजूरीला जाताना आई-मुलीचा हृदयद्रावक अंत, नांदेड हळहळलं

    लेकीला हळद लागण्यापूर्वीच सारं संपलं, मजूरीला जाताना आई-मुलीचा हृदयद्रावक अंत, नांदेड हळहळलं

    Nanded Accidenr Mother-Daughter Death: मे महिन्यात लेकीचं लग्न होतं. मात्र, त्यापूर्वीच एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मजूरीला जात असताना ट्रक ट्रॉली विहिरीत कोसळली आणि तिघांचा अंत झाला.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड: मे महिन्यात लेकीचे लग्न ठरल्याने सर्व जण तयारीला लागले होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी लेकही आईसोबत मजूरी करण्यासाठी निघाली होती. परंतु, नियतीला कदाचित ते अमान्य होते. मजुरीवर घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले. यात दोन्ही मायलेकींचा मृत्यू झाला. तर अन्य एका मुलीचा देखील या घटनेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास नांदेडमधील आलेगाव शिवारात घडली.

    धूरपता सटवाजी जाधव (वय १८) आणि सिमरन संतोष कांबळे (वय १८) असे दोन मुलींचे नावे आहेत. हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. धुरपता जाधव आणि सिरमन कांबळे ह्या दोघी एकाच गावातील आणि गरीब कुटुंबातील होत्या. महिना भरा पूर्वी दोघींची सोयरीक झाली होती. मे महिन्यात तारीख काढणार होते. लग्नाला पैसे लागणार म्हणून दोन्ही मुली हातभार लावण्यासाठी आई वडिलांसोबत शेत मजुरीला जात होती. २५० रुपये त्यांना मोबदला देखील मिळायचा. लेकीच्या लग्नामुळे दकांबळे आणि जाधव कुटुंबीय आनंदीत होते. मात्र दुर्देवी घटना मुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदवर विरजन पडलं.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    शेतात कामासाठी शेतमजूर नेत असताना टॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला ठार झाल्याची घटना घडली. आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण १० महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टर मधून येत होते. ताराबाई जाधव ( वय ३५), धरूपता जाधव (वय १८), सिमरन कांबळे (वय १८), सरस्वती लखन भूरड (वय २५), चऊत्राबाई माधव पारदे (वय ४५), मीना राऊत (वय २५ आणि ज्योती सरोदे (वय ३०) अस मयतांची नावे आहेत. मयत हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील सर्वजण रहिवाशी होते. विशेष म्हणजे ताराबाई जाधव आणि धरूपता जाधव या दोघी माय लेकी होत्या.

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कच्च्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत पडले. ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला. विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाले. ट्रॅक्टर पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी पुरभाबाई कांबळे, पार्वतीबाई बुरड आणि सटवाजी जाधव यांना सुखरूप बाहेर काढले. सात महिला ट्रॅक्टर खाली अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर सातही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

    नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे. अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed