• Sun. Jun 14th, 2026
    मोबाईल पाण्यात पाडला, १३ वर्षांच्या मुलाने महिलेला डोक्यात दगड घालून संपवलं, जालना हादरलं

    Jalna Minor Boy Killed Woman: जालन्यात एका महिलेचा शेतात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका १३ वर्षांच्या मुलाने या महिलेची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    संजय अहेर, जालना: जालन्यात एका सातव्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय विधीसंघर्ष बालकाने पाण्यात मोबाईल फेकल्याच्या रागातून एका ४१ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केला. धक्कादायक घटना समोर आली आहे. मिराबाई उर्फ संध्या बांडारे असं मयत महिलेचे नाव आहे. जालन्यातील अंतरवाली टेंभी या गावामध्ये २५ मार्च रोजी शेतामध्ये या महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली.

    मयत महिलेने विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरून या बालकाने महिला शेतामध्ये झोपली असताना तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल असून पुढील कारवाईसाठी या बालकाला बालन्यायमंडळासमोर हजर करणार असल्याची माहिती जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे.
    Pune Crime: रात्री झोपी गेले ते उठलेच नाहीत, एक क्लू सापडला अन् भयंकर घटनेचा उलगडा, पत्नीनेच.., पुण्यात खळबळ
    याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आंतरवाली टेंभी येथे २५ मार्च रोजी महिला मिराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोडारेचा तिच्या शेतामध्ये डोक्यात दगड टाकुन खून करण्यात आला होता. याबाबत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द तिर्थपुरी पोलीस ठाण्यात कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका १३ वर्ष ६ महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

    या विधीसंघर्षग्रस्त मुलाने सांगितलं की, त्याच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी ती वांरवार अडवायची. तसेच, विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेने पाण्यात टाकून खराब केला होता. त्याचाच राग मनात धरुन २५ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही महिला शेतामध्ये झोपलेली असताना विधीसंघर्षग्रस्त मुलाने तिच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed