• Sat. Apr 12th, 2025 7:15:12 AM

    सपकाळांनी भाकरी फिरवली,फडणवीसांना नागपुरातच घेरण्याची तयारी, माजी मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

    सपकाळांनी भाकरी फिरवली,फडणवीसांना नागपुरातच घेरण्याची तयारी, माजी मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

    Nagpur Congress new appointment – हर्षवर्धन सपकाळांनी नागपूरमध्ये माजी मंत्र्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची संघटना बांधणी करुन फडणवीसांना घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांची टीम आणि जिल्हा व शहर समित्या कशा राहतील, याची उत्सुकता नेते व कार्यकर्त्यांना आहे. याचा निर्णय येत्या काही दिवसात अपेक्षित असून नागपुरसाठी माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाला नवी ऊर्जा व बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली. याअंतर्गत वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. पंधरवड्यात अहवाल आल्यानंतर नवीन नियुक्त्या होतील, असा अंदाज आहे. नागपूरात पक्षाची संघटना बांधणी करुन देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.

    काँग्रेस (Congress) कार्यसमितीने तीन वर्षांपूर्वी उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिरात अनेक निर्णय घेतले. यात कुणालाही पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहू नये, एक व्यक्ती एक पद, एका कुटुंबातील दोघांना पद नको यासारखे निर्णय होते. या निर्णयानंतर विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे व तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी राजीनामा दिला होता, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन त्यांना कायम ठेवण्यात आले. दरम्यान, लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेरबदल करण्याचे टाळले होते.

    आमदार विकास ठाकरे यांना शहराध्यक्षपदी अकरा वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक बरेचदा सक्रिय होतात. अनेकवेळा वाद दिल्ली दरबारात गेले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्ष सांभाळल्याने ठाकरे यांना कायम ठेवण्यात आले. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये ते सलग निवडून आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेकमधून विधानसभा निवडणुकीची तयारी केली. मात्र, ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असले तरी, संघटनेवर त्यांचे वर्चस्व अजुनही कायम आहे, हे विशेष. शहर व ग्रामीणमध्ये हर्षवर्धन सपकाळ कुणाला संधी देतात आणि मोर्चेबांधणीत कोण सरस ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed