• Fri. Mar 13th, 2026

    समर्थ कुठे गेला? मुळा मुठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली, सातवीतील लेकराचा बुडून मृत्यू

    समर्थ कुठे गेला? मुळा मुठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली, सातवीतील लेकराचा बुडून मृत्यू

    Pune Student drown in Mula Mutha Canal : मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : हडपसर, सातववाडी येथील नवीन मुळा-मुठा कालव्यात (Mula Mutha River) पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी मुलगा पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला होता. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी दोन दिवस अथक प्रयत्न करूनही मृतदेह मिळून येत नव्हता. अखेर तिसऱ्या दिवशी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कालव्यात मुलाचा मृतदेह मिळून आला. पुण्यातील (Pune News) या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    वाहत्या पाण्याचा अंदाज चुकला?

    समर्थ अमोल यादव (वय १३, रा. सर्वे नंबर ८, महात्मा फुलेनगर, सातववाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ हा साधना विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शनिवारी सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

    तीन दिवसांनी मृतदेह सापडला

    त्याच्या सोबतीच्या मित्रांनी समर्थ दिसत नसल्याने आरडाओरडा सुरू केला. जवळील नागरिकांनी पाण्यात उड्या मारून शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो मिळून आला नाही. काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यांनी दोन दिवस शोध घेतला. मात्र, समर्थ सापडला नाही.
    Pune Accident : पुण्यात कंटेनरला धडकून स्विफ्टचा चक्काचूर, बापलेकीसह मामाचा जागीच मृत्यू, आई गंभीर
    तिसऱ्या दिवशी यवत जवळील बोरी आंदी येथे कालव्यात सकाळी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत आल्याचे दिसून आले. यवत पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना बोलावून मृतदेह ताब्यात दिला.
    Pune Crime : पुण्याच्या भरवस्तीत ‘नसते उद्योग’, लॉज चालक महिलेवर गुन्हा, ग्राहकांना मुलींचे फोटो-नंबर पाठवून…

    नाशिकमध्ये तरुणाचा मृत्यू

    दुसरीकडे, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे घडली. या प्रकरणी सोमवारी (दि. २४) नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अक्षय खैरनार असे मृत तरुणाचे नाव आहे. कृष्णाई मंगल कार्यालयात अक्षय खैरनार काम करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाने तो सुपरिचित होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed