• Fri. Mar 6th, 2026
    नागपूरमध्ये सर्वत्र कर्फ्यू हटवला, रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवा आदेश लागू

    Nagpur Violence Curfew News : नागपुरात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील कर्फ्यू हटवला असल्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.

    Lipi

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर पोलिसांनी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा देत कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर आणि तहसीलसह सर्व कर्फ्यूग्रस्त भागांमधून कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन आदेश रविवारी दुपारी तीन वाजतापासून लागू करण्यात आला.

    यापूर्वी, १७ मार्च रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू केला होता. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि शांतता प्रस्थापित झाल्याने संपूर्ण शहर कर्फ्यूमुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणांमुळे गणेशपेठ, कोतवाली, तहसील, इमामवाडा, सक्करदरा, यशोधरानगर, शांतिनगर, लकडगंज आणि पाचपावली परिसरात कर्फ्यू लावण्यात आला होता. या काळात या भागातील सर्व दुकाने, बाजारपेठा, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांना बंद ठेवण्यात आले होते. सततच्या बंदमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यामुळे शहरवासीयांकडून कर्फ्यू हटवण्याची मागणी होत होती.
    Nagpur News : नागपूर हिंसाचाराचा मेसेज बांगलादेशातून आला, फईम खानचं मालेगावशीही कनेक्शन; भाजप नेत्याना मोठा दावा
    या मागणीकडे लक्ष देत पोलीस प्रशासनाने शनिवारी पाच ठिकाणी कर्फ्यू हटवला होता. तसेच गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील भागात नागरिकांना सकाळी ७ ते १० या वेळेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता.
    Nagpur News : दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, जागीच मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो
    रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी उर्वरित भागांमधूनही कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेतला. दुपारी तीन वाजल्यापासून नवीन आदेश लागू झाला असून आता संपूर्ण नागपूर शहर कर्फ्यूमुक्त झाले आहे. या निर्णयामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून आता शहरात पूर्ववत दैनंदिन जीवन सुरळीत सुरू होईल. पोलिसांनी मात्र नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता टिकवण्याचे आवाहन केले आहे.

    Nagpur Violence : नागपूरमध्ये सर्वत्र कर्फ्यू हटवला, रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवा आदेश लागू

    नागपुर हिंसाचार प्रकरणात ९२ जणांना अटक

    नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ अल्पवयीन आरोपींवर विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पोलिसांवर हल्ला करणे गंभीर बाब आहे आणि कायदा सुव्यवस्थेसाठी दोषींवर कठोर कारवाई होईल. हिंसाचार करणाऱ्यांना कुठलीही सवलत दिली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. सध्या पोलीस तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed