• Thu. Sep 17th, 2026
Raigad Fort: रायगडावर पाय घसरून पडल्याने भीम अनुयायाचा मृत्यू, समता दलाचा सैनिक हरपला

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आलेल्या एका भीम अनुयायाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Lipi

अमुलकुमार जैन ,रायगड: किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव अडकुजी घायवन वय वर्ष ६४, राहणार उरळी कांचन पुणे, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

२० मार्च रोजी पुण्याहून ४३ भीम अनुयायी महाड चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील भीमराव हे पायऱ्या उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत भीमराव घायवन यांनी समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून अनेक वर्ष काम केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड रुग्णवाहिका चालक अनंत अवकीरकर यांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून महाड तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

तोरणा गडावर पुण्याच्या पर्यटकाचे निधन
फेब्रुवारी महिन्यात तोरणा गडावर एका पयर्टकाचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. किल्ले तोरणा गडावर पुण्यातील दोन पर्यटक फिरण्यासाठी आले होते. ते किल्ल्यावरच मुक्काम करणार होते. मात्र रणजित याला किल्ला चढताना श्वास घेण्यास थोडासा त्रास जाणावू लागला म्हणून ते किल्ल्यावर असणाऱ्या एका मंदिरात थांबले. पण त्या ठिकाणीच रणजित शिंदेला हृदयाविकाराचा झटाका आल्याचं समजलं आणि मंदिरातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोबत असलेल्या व्यक्तीने पोलिसांना आणि रिसक्यू टीमला फोन केला होता.

शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला

१६ मार्चला शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला होता. त्यात ४७ जण जखमी झाले होते. त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना जुन्नरच्या छ्त्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी १७ मार्चला गेलेल्या १५ ते २० शिवभक्तांवरही मधमाशांनी हल्ला केला होता. त्यानंतर शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed