• Wed. Apr 23rd, 2025 7:23:33 AM

    ‘त्या’ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? शिंदेसेनेची महिला आघाडी CMना निवेदन देणार

    ‘त्या’ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? शिंदेसेनेची महिला आघाडी CMना निवेदन देणार

    Sanjay Raut Case- संजय राऊत यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेच्या महिला आघाडी मुख्यमंत्र्यांना स्वप्ना पाटकर प्रकरणी निवेदन देणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रदीप भणगे, ठाणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे. राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार म्हस्के यांनी यावेळी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    तक्रारीला ९ वर्ष आणि गुन्हा दाखल होऊ तीन वर्षानंतरही राऊतवर पोलीसांनी कारवाई केली नसल्याने स्वप्ना पाटकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर आज खासदार म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली. ते पुढे म्हणाले की, राऊत विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. राऊत यांना कोण पाठिशी घालत आहे, राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही,

    दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का? स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची भूमिका काय असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. स्वप्ना पाटकरला न्याय मिळवून शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.

    संजय राऊत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. राऊत २४ तास केवळ राजकारण करतात. त्यांनी राज्यात एखादी बालवाडी देखील सुरु केली नाही. आता राऊत शरद पवारांवर टीका करत आहेत, हे दुर्देव आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. शरद पवारांनी आतातरी राऊत सारख्या कपटी माणसाला दूर ठेवावा, असे खासदार म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यांची बांधिलकी हिंदूंशी नसून दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे, त्यांचा हिरवा चेहरा आज समोर आला, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed