• Thu. Mar 12th, 2026

    जयंत पाटील यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेंची मागितली माफी, नंतर फडणवीसांना विचारला सवाल

    जयंत पाटील यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेंची मागितली माफी, नंतर फडणवीसांना विचारला सवाल

    Jayant Patil Apologize Eknath Shinde : जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा योग आज जुळून आला. यावेळी मुलाखतीच्या आधी जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागितली. त्यानंतर अगदी तसाच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी मुलाखत सुरु होण्याआधीच जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितली. यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ माजलेला बघायला मिळाला. विशेष म्हणजे मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नात जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना कोटी आणि मिश्किल टोले लगावणं सुरु झालं. त्यामुळे मुलाखतीला चांगलाच रंग चढताना दिसला.

    मुलाखतीच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. “उत्तरे देणाऱ्यापेक्षा प्रश्न विचारणारा जास्त नर्व्हस झालेला आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उत्तर दिलं. “असं म्हणून प्रश्न विचारणाऱ्याने दहा-बारा गुगली तयार करुन ठेवलेल्या आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

    “नेहमीच पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याची सवय आहे. पण पहिल्यांदाच मी प्रश्न विचारतोय. त्यामुळे थोडेसे रुळावरुन घसरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राग मानणार नाहीत, अशी अपेक्षा करतो”, असं जयंत पाटील म्हणाले. यानंतर त्यांनी तसाच प्रश्न विचारला.

    जयंत पाटील यांचा प्रश्न, फडणवीसांचं उत्तर

    “तुम्ही मुख्यमंत्री होऊन आता 3 महिने झाले. पण अद्यापही वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी गेलेला नाहीत. आम्हा सगळ्यांना वर्षावर जावून मुख्यमंत्र्यांना भेटायला जायची सवय होती. आपण वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
    Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा विधान परिषदेच्या सभापतींविरोधात सर्वात मोठा गेम, सभागृहातील गदारोळानंतर आता काय होणार?
    “काही जणांना तो प्रश्न उगाच आहे. काही लोकांना खरंच तो प्रश्न पडला आहे. मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल. 27 मार्चला माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपेल. त्यानंतर मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर राहायला जाणार आहे”, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    ‘मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली ‘, फडणवीसांचं मिश्किल उत्तर

    तुमच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री आपण मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असल्याचं म्हणाले. तुमच्या अशा 3 लाडक्या मंत्र्यांची नावे सांगण्याबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल उत्तर दिलं. “मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे. त्या योजनेच्या निकषात जे मंत्री बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेल”, असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यावर जयंत पाटील यांनी या पदासाठी बहुतेक स्पर्धा लागेल, असं म्हटलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *