Pune Crime News : पुण्यातील वानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याचा आरोपी राहुल संजय मिरेकरला तातडीने अटक केली आणि २४ तासांच्या आत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपीने एका तरुणीचा विनयभंग केला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करून त्वरित कारवाई केली.
वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्चला रात्री दहा ते साडेदहा या वेळेत एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. पीडित तरुणी वैयक्तिक कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपी राहुल याने काहीही कारण नसताना तरुणीला अडवले. त्या वेळी तरुणीचा होणारा नवरा तिच्यासोबत होता. त्याने आरोपीला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. त्यावर आरोपीने तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे तरुणी त्याच्या मदतीसाठी धावली असता, आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन करून शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. मात्र, तिने धैर्य दाखवून सोमवारी (१७ मार्च) सायंकाळी साडेचार वाजता वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली.
तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९, ३५२, ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. पोलिसांनी काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन, त्याला सोमवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. मंगळवारी (१८ मार्च) दुपारी लष्कर न्यायालयात त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. न्यायालयाने हे स्वीकारून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष जाधव आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची त्वरित कारवाई आणि २४ तासांत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

