Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेची लाट देखील असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे होळीपूर्वीच नागपूर शहर आणि विदर्भातील पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या आठवड्यात विदर्भात तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात 20 ते 22 मार्च या दरम्यान हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात अमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात 39 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. याखेरीज, ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 41.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 19 तारखेला उष्णतेची लाट घसरणार आहे. या दिवसानंतर राज्यात गारपीटसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 20 तारखेला चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली या भागात उष्णता वाढणार आहे. त्या ठिकाणी तापमानाचा पारा वाढणार असून तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, 19 तारखेनंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसह पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Prashant Koratkar : सर्वात मोठी बातमी! कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर वाशिम आणि यवतमाळमध्ये 21 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे. या जिल्यांमध्ये वादळी पावसासह गारपीटची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

