Nagpur Clash : नागपुरात दोन गटात मोठा राडा झाला. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत. जमावाकडून पोलिसांच्या दिशेला जोरदार दगडफेक केली जात आहे. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना भावनिक साद घालत कळकळीची विनंती केली आहे.
नितीन गडकरी काय म्हणाले?
“नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषत: राहिलेली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी आणि कुणीही रसत्यावर येऊ नये. सगळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावं. सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्यानुरुप आपला व्यवहार करावा”, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.
Nagpur Dispute : ‘दगड, चाकू फेकून मारत आहेत’, आग विझवायला गेलेल्या जवानांची आँखों देखी आपबीती, नागपूर शहरात मोठा राडा
“ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असा विश्वास मी देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्वाबद्दल माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करावी, अशी माझी नम्र विनंती आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
‘हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे’
“नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणूनबुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी”, असं ट्विट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
बावनकुळे यांचंदेखील कळकळीचं आवाहन
“नागपूर येथील महाल भागात दगडफेकीच्या दुर्दैवी घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. माझे सर्व नागपूरकरांना नम्र आवाहन आहे की, कृपया आपण सर्वांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे. नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्याने शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून नागपूर शहराकडे पाहिले जाते. ही शहराची परंपरा आपण सर्वांनी जपावी. तसेच, प्रशासनावर संपूर्ण विश्वास ठेवत कुठल्याही अफवांना बळी न पडता, नागपूर शहरामध्ये शांतता नांदण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती”, असं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

