विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ५ जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होत आहे. महायुतीकडे असलेलं संख्याबळ पाहता भाजपचे ३ आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी होऊ शकतो.
विधान परिषदेचे सदस्य असलेले ५ जण गेल्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. परिषदेवरील ५ सदस्य विधानसभेत गेल्यानं वरिष्ठ सभागृहातील ५ जागा रिक्त झाल्या. यातील १ जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. नंदूरबारच्या आमश्या पाडवी यांना सेनेनं परिषदेवर संधी दिली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री के. सी. पाडवींचा पराभव करत विधानसभा गाठली. आमश्या पाडवींचा विधान परिषदेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत होता.
पाडवी यांच्या जागी परिषदेवर जाण्यासाठी शिवसेनेतून ६ जण इच्छुक आहेत, अशी माहिती पक्षाच्या मंत्र्यानं दिली. याबद्दल पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे वरिष्ठ नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतील. १७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा असल्यानं १६ मार्चपर्यंत उमेदवार जाहीर होईल, असं सेनेच्या मंत्र्यानं सांगितलं.
Eknath Shinde: मित्र(पक्ष) हीच संपत्ती, फडणवीसांनी टाळली ‘आपत्ती’; ‘त्या’ समितीत शिंदे इन, नियमच बदलले
पाडवी यांच्या जागी परिषदेवर जाणाऱ्या नेत्याला सव्वा तीन वर्षांचा कालावधी मिळेल. यासाठी ६ नेते इच्छुक आहेत. त्यात शीतल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नावं आघाडीवर आहेत. दोन्ही नेते पक्ष नेतृत्त्वाच्या जवळचे आहेत. म्हात्रे मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. त्या पक्षाच्या मुंबईतील महत्त्वाच्या नेत्या आहेत. तर रघुवंशी आदिवासी बहुल नंदूरबारमधील महत्त्वाचे नेते आहेत. आमश्या पाडवींच्या विजयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अक्कलकुवा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं रघुवंशी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. ‘मी पक्ष नेतृत्त्वाच्या संपर्कात आहे. नंदूरबारमध्ये मी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला होता. मी आमश्या यांना विजय मिळवून दिल्यास त्यांच्या जागी मला परिषदेवर संधी दिली जाईल, असा शब्द मला तेव्हा शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे मला संधी मिळेल, असं वाटतं,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
Uddhav Thackeray and Raj Thackeray: भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा! ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचं आयोजन, मुहूर्त ठरला!
दुसरीकडे शीतल म्हात्रे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर म्हात्रेंनी केलेलं भाषण गाजलं होतं. काय दांडा, काय ढुंगण म्हणत त्या बंडखोरांवर तुटून पडल्या होत्या. त्यांचं भाषण बरंच गाजलं होतं. पण त्यानंतर पुढच्या काही दिवसांत त्यांनी पलटी मारली. त्या शिंदेसेनेत गेल्या. तेव्हापासून त्या ठाकरेंच्या शिवसेनेवर तुटून पडत आहेत. ठाकरे कुटुंबाला त्यांनी सातत्यानं लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्या पश्चिम उपनगरातील दहिसरच्या आहेत.

