CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana : महायुतीतील नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजना हाताशी धरुन जोरदार प्रचार केला. तर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ १५०० रुपयांवरुन २१०० रुपये केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण लाडक्या बहिणींच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. सरकारकडून लाडक्या बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना मात्र २१०० रुपयांचा उल्लेख केलेला नाही. परिणामी लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
CM Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींची २१०० रुपयांसाठी निराशाच; मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोणतेही पैसे कमी…’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकारात परिषदेत म्हटले की, ‘यंदा 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प हा मांडण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना केअरफुल एक्सपेंडिचर मध्ये टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन त्यांनाही दोन पैसे मिळतील. राज्यात Apex आणि प्रत्येक जिल्ह्यात अशा सोसायट्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे, म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. सरकार बहिणींना १५०० रुपये देत आहे. पण महिलांना स्वावलंबी करण्याकरिता पंतप्रधानांनी लखपती दिदी योजना आणली. आपण गेल्यावर्षी २३ लाख लखपती दिदी तयार केल्या. यावर्षी २४ लाखांचं उद्दिष्ट आहे. १ कोटी महिलांना बनवण्याचं आम्ही ठरवलं आहे.’
फडणवीस पुढे म्हणाले, ‘अजितदादांनी संतुलित अर्थसंकल्प सादर केला आहे. ११ वा अर्थसंकल्प अजितदादांनी सादर केला आहे. बॅरिस्टर शेशराव मार्कंडेय यांनी १३ अर्थसंकल्प सादर केलेत. आता या टर्ममध्ये रेकॉर्ड तोडला आहे. आम्ही कोणत्याही योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. २१०० रुपये देण्यावर आमचं काम सुरु आहे. पण हे करताना आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे. मागच्या ट्रेंडच्या आधारावर पैशांची तरतूद केलेली आहे. पुढे ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, वाढवता येतील, कोणतीही अडचण नाही’ असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
‘२१०० करण्याचं निश्चितपणे काम सुरु आहे. जर आपल्याला शाश्वतपणे योजना सुरु ठेवायचीय तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल, ३ टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. बॅलन्स तयार करुन आम्ही दिलेलं आश्वासन नक्की पूर्ण करु,’ अशा शब्द फडणवीसांनी बहिणींना दिला आहे.

