• Mon. Mar 16th, 2026
    बगला घासत राज ठाकरेंची आव्हाडांकडून नक्कल; महाकुंभातील स्नानावरुन मनसे प्रमुखांना सलाम

    Jitendra Awhad: अरे हाड, कोण पिणार ते गंगेचं पाणी, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या गोटातून टीका होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: अरे हाड, कोण पिणार ते गंगेचं पाणी, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या गोटातून टीका होत आहे. कुंभमेळ्यात महिला, पुरुष बगला घासतात. तेच पाणी प्यायचं का, असा सवाल राज यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यातील भाषणात उपस्थित केला. यावेळी त्यांनी बगला घासण्याची नक्कलही केली. राज यांच्या विधानाचं, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाच्या कामकाजासाठी जितेंद्र आव्हाड विधिमंडळात पोहोचले. तेव्हा त्यांना राज ठाकरेंनी महाकुंभातील स्नानाबद्दल केलेल्या विधानाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. ‘राज ठाकरेंनी महाकुंभावर विधान केलंय. त्यांनी असं असं केलं’, असं म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंप्रमाणेच बगला साफ करण्याची नक्कल केली. ‘हे जर आम्ही केलं असतं ना, तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे आले असते. घरावर दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीदेखील ठरलो असतो,’ असं आव्हाड पुढे म्हणाले.

    ‘राज ठाकरेंनी त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं. भारतात सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन की असं हिमतीनं बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिंमत लागते हे सगळं बोलायला. आपल्या मनातलं बोलताना हिंमत लागते. आम्ही कद्रू झालो आहोत. आम्ही षंढ झालो आहोत. आम्ही बोलायला पण घाबरतो. राज ठाकरे त्यांच्या मनातलं बिनधास्त बोलले आणि ते कित्येक भारतीयांच्या मनात आहे. त्यांच्या धाडसाला सलाम आहे. बाकी मला यावर काही बोलायचं नाही. राज ठाकरेच्या धाडसाला सलाम इतकंच मी म्हणेन,’ अशा शब्दांत आव्हाडांनी राज यांचं कौतुक केलं.

    काय म्हणालेले राज ठाकरे?
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खिल्ली उडवली. बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तिथलं पाणी आणलं असता पिण्यास नकार दिल्याचंही जाहीरपणे सांगितलं. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी दिला. मनसेच्या १९व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    ‘मुंबईत त्या दिवशी बैठक ठेवली होती. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता? आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?,’ अशा शब्दांत राज यांनी महाकुंभातील स्नानाची खिल्ली उडवली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *