ST Bus Toll Free Number: राज्य परिवहन महामंडळाने १८००-२२-१२५० अशा टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली. तिचा प्रचारप्रसारासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळापासून ते गाड्यांपर्यंत हा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र यावर संपर्क साधला असता प्रवाशांच्या पदरी निराशाच पडत आहे.
हायलाइट्स:
- होळी-धुळवड, उन्हाळी सुट्टीमुळे एसटीला मागणी
- प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाकडून टोल फ्री क्रमांक
- संपर्क होत नसल्याने स्थानकात जाऊन चौकशी करण्याची वेळ
‘उन्हाळ्यामुळे दिवसाचा प्रवास टाळण्यासाठी रात्री मुंबई सेंट्रलवरून खेडला जाणाऱ्या शेवटच्या एसटीबाबत चौकशी करण्यासाठी एसटीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला होता. तीन वेळा हा क्रमांक ‘संपर्क कक्षाबाहेर’ असल्याचे सांगण्यात आले. अखेर स्वत: मुंबई सेंट्रल स्थानकातील चौकशी केंद्रावर जाऊन चौकशी करावी लागली. एसटी गाड्यांच्या वेळांची माहिती हेल्पलाइनमधून मिळत नसेल तर हा क्रमांक का देण्यात येतो’, असा प्रश्न प्रवासी गणेश सावंत यांनी उपस्थित केला.
‘बोरिवली ते सातारा शिवशाही बसमधील आसने सुस्थितीत नव्हती. बसमध्ये अस्वच्छता होती. वातानुकूलित यंत्रणाही केवळ नाममात्र होती. खिडक्यांवर लावण्यात आलेले पडदे मळक्या स्वरूपात होते. याबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता हेल्पलाइन बंद होती. वारंवार प्रयत्न करूनही क्रमांक बंदच होता’, असे प्रवासी राजू मुल्ला यांनी सांगितले.
सुविधांचा दर्जा केव्हा सुधारणार?
एसटी महामंडळाच्या सर्व गाड्यांमध्ये जानेवारीअखेर १४.९५ टक्के तिकीट दरवाढ लागू करण्यात आली. महामंडळाच्या नियमित फेऱ्यांमध्येही घट झाली आहे. साध्या गाड्यांची अपुरी संख्या, शिवशाही गाड्यांची अत्यंत वाईट स्थिती अशी एसटीची स्थिती आहे. परिणामी, भाडे वाढले असले तरी सुविधांचा दर्जा खालावतच आहे. एसटी महामंडळासह राज्य सरकारने प्रवासी सुविधा उंचावण्यासाठी लक्ष घालणे गरजेचे असल्याची अपेक्षा एसटी प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
शिमग्याआधीच प्रवाशांच्या बोंबा! होळीनिमित्त खासगी बसचे भाडे कडाडले, मुंबई ते कोकण तिकीट किती?
सवलतींमुळेच एसटीला प्राधान्य
महिला सन्मान योजनेत महिलांना सरसकट ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना १०० टक्के सवलत आणि अन्य विशेष सवलतींमुळे सर्वसामान्य, ‘वाट पाहीन, पण एसटीने जाईन’ म्हणत एसटी प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीच्या तुलनेत खासगी बसगाड्यांचा दर्जा चांगला असतो. मात्र सवलतींमध्ये प्रवासाची सुविधा असल्याने एसटीकडे प्रवाशांचा ओढा कायम आहे.

