Raju Shetti on Farmers Crop Insurance : राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरुन टीका करत एकही आमदार यावर बोलत नसल्याचं म्हटलं आहे. सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला अडचणीत आणत असल्याचंही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे परभणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की विमा कंपन्या म्हणतात की सरकारने पीक विम्याचा हप्ताच न दिल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात अडचणी येत आहेत. सरकार या कंपन्यांना पिक विम्याचा हप्ता कधी देणार असा प्रश्न उपस्थित झाला. खरिपाच्या पिकाचे नुकसान होऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. नियमानुसार नुकसानीचा आगरीन २५ टक्के रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी असा नियम आहे, पण सरकारनेच जर पिक विमा कंपन्यांना आपला हप्ता दिला नसेल तर पिक विमा कंपन्या देखील त्या आडून शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देत नाहीत. त्यामुळे सरकार आणि पीक विमा कंपन्या मिळून शेतकऱ्यांना चांगल्याच अडचणीत आणत आहेत.
सोयाबीन पेंड निर्यातीतील अडथळे सरकारने दूर न केल्याने सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी
सातत्याने सोयाबीनची पेंड निर्यात व्हायची, त्यात अडथळे आणण्यात आले. त्याला प्रोत्साहन द्यायची गरज होती पण ते वेळेवर न केल्यामुळे सोयाबीनचा हमीभाव चार हजार नऊशे रुपये असताना आज सोयाबीन तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये दराने विकावे लागत आहे. सरकारकडून सोयाबीन खरेदीच्या नावाखाली केवळ आणि केवळ फार्स केला गेला. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करून रांगा लावायचा आणि शेतकऱ्यांसमोर दहा चाकी गाड्यातून व्यापाऱ्यांचे सोयाबीन बोगस सातबारा घेऊन जमा करून घ्यायचे.
Raju Shetti : सरकार-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात, एकही आमदार यावर बोलत नाही; राजू शेट्टींनी सरकारला घेरलं
बारदाना उपलब्ध नाही, यंत्रणा नाही म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करताना अडथळे निर्माण करण्यात आले आणि आता मुदत संपली म्हणून शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करत नाहीत. त्यातच पुन्हा जे सोयाबीन विकत घेतले आहेत ते नाफेडकडून बाजारात विक्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनला पुन्हा भाव मिळणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याचे काम सरकारने केले असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

