• Wed. Mar 11th, 2026
    मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा! वसई, नालासोपारा बसस्थानकांमध्ये सुरक्षेचे तीनतेरा

    Vasai News: सुरक्षारक्षकांचा अभाव, बसस्थानकांतील थांब्यांवरील गर्दुल्ल्यांचा आणि मद्यपींचा अड्डा, अनधिकृत पार्किंग यामुळे वसई तालुक्यातील वसई, नवघर आणि नालासोपारा ही तिन्ही बसस्थानके समस्यांचे माहेरघर ठरली आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स
    vasai bus stop

    म.टा. वृत्तसेवा, वसई: सुरक्षारक्षकांचा अभाव, बसस्थानकांतील थांब्यांवरील गर्दुल्ल्यांचा आणि मद्यपींचा अड्डा, अनधिकृत पार्किंग यामुळे वसई तालुक्यातील वसई, नवघर आणि नालासोपारा ही तिन्ही बसस्थानके समस्यांचे माहेरघर ठरली आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत.

    वसई, नवघर आणि नालासोपारा ही अत्यंत वर्दळीची बसस्थानके आहेत. रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या नवघर आणि नालासोपारा या दोनही बसस्थानकांसह वसई बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेचा एसटी महामंडळाकडून गांभीर्याने विचार केला जात नसल्याचे दिसते. वसई पश्चिमेला असलेल्या नवघर बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात. येथील बस थांब्यांवर कायम अंधार असतो. संपूर्ण स्थानकात विजेचे दिवे बंद असल्याचे कायम निदर्शनास येते. त्यामुळे एसटी महामंडळ विजेची बचत करत असल्याची बोचरी टीका प्रवासी करतात. या बसस्थानकात कायम गर्दुल्ले आणि मद्यपींचा वावर असतो. येथे मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी कोणत्याही प्रहरी मैफल रंगते. त्याचा कायम त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रवासी वारंवार करतात. ‘या समस्यांमुळे आम्हा प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे’, असे प्रवासी निहार पाटील यांनी सांगितले.
    अहमदाबाद ते मुंबई फक्त ३ तासांत; बुलेट ट्रेनचे काम प्रगतिपथावर, किती काम पूर्ण? कोणत्या स्टेशनला थांबा?
    नालासोपारा आणि वसई गाव येथील बसस्थानकातूनही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. येथेही गर्दुल्ल्यांचा वावर असतो. तीनही बसस्थानकांत सुरक्षारक्षक नसून, अनधिकृत पार्किंगही मोठ्या प्रमाणावर असते. बसस्थानकांमध्ये खासगी वाहने बिनदिक्कतपणे पार्क केली जातात. रेल्वे स्थानकात जाण्याचा मार्ग बसस्थानकातूनही असल्याने, नालासोपारा आणि नवघर बसस्थानकांत प्रवाशांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचा खच असतो. वसई बसस्थानकात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर नागरिकांची वाहने उभी असलेली दिसतात. या खासगी वाहनांमुळे एसटी प्रवाशांची मोठी अडचण होते.
    मुंबईची यंदाही तुंबई? पम्पिंग स्टेशनअभावी अंधेरी, शीव, वडाळ्यासह ‘या’ भागात पूरधोका कायम
    नवघर बसस्थानक मोठे असल्याने येथे कोणत्या कोपऱ्यात काय चालते याकडे एसटी महामंडळाचे कायम दुर्लक्ष असते. अनेकदा येथील विजेचे दिवेही बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधितांनी तीनही बसस्थानकांमध्ये योग्य प्रमाणात सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. तसेच विजेची समस्या दूर करून मद्यपी, गर्दुल्ल्यांना त्वरित हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed