Sanjay Raut Nashik Daura: नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख बदलाच्या हालचालींना वेग आला असून, राऊत यांनी शुक्रवारी (दि.२८) पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन फेरबदलाचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. नाशिक जिल्ह्यात एकाही जागेवर शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात चलबिचल सुरू झाली असून, माजी नगरसेवकांकडून पक्षांतर सुरू झाले आहे. आगामी पाच वर्षे राज्यात महायुतीचेच सरकार असल्यामुळे सत्तेत जाणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. तर, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटातील नेत्यांना ऑफर दिली जात आहे. ठाकरे गटाचे काही बडे पदाधिकारी पक्षांतर करण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्यानंतर राऊत ‘डॅमेज कंट्रोल’साठी शुक्रवारी (दि. २८) नाशिकमध्ये दाखल झाले. त्यात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. त्यादृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन खासदार राऊत यांनी केले. यावेळी पक्षातील नाराजीविषयीही राऊत यांनी कोअर कमिटीतील सदस्यांची चर्चा केली. त्यात आमच्यावर अविश्वास असेल, तर आम्हाला पदावर राहायचे नाही, अशी भूमिका या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळे जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख बदलावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
गायकवाड, शिंदे, गितेंच्या नावाची चर्चा
बैठकीत राऊत यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना बढती देऊन नव्याने संधी देण्याचा फॉर्म्युला या बैठकीत मांडल्याचे समजते. त्यानुसार जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना राज्य पातळीवर बढती देऊन त्यांच्या जागेवर नवीन जिल्हाप्रमुखाची निवड करण्याबाबतची चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्हाप्रमुखपदासाठी दत्ता गायकवाड, माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह विलास शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, महानगरप्रमुख पदासाठी डी. जी. सूर्यवंशी आणि प्रथमेश गिते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रातही फेरबदल राऊत यांच्याकडे
नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी आहे. या चारही जिल्ह्यांत पक्षाला यश मिळाले नाही. त्यामुळे संघटनेची नव्याने उभारणी करावी लागणार आहे. त्यात ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राऊत यांनी शुक्रवारी नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये बोलावून घेत, त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, नव्या जबाबादाऱ्यांसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे नाशिकसह चारही जिल्ह्यांमध्ये आगामी काळात संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे चित्र आहे.

