Virar Three From Family Died: विरारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि लेकीची हत्या केल्यानंतर या व्यक्तीने स्वत:चा जीव दिला. त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शाळेत गेला असल्याने तो बचावला आहे.
घराचं दार बंद पाहून शाळेतून आलेला मुलगा शेजाऱ्यांकडे गेला
विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात उदयकुराम काजवा (वय ५२) हा त्याची पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असे चार जणांचे कुटुंब वास्तव्यस होते. सोमवारी अकरा वर्षाचा मुलगा वेदांत हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर वेदांत शाळेतून घरी परतला. मात्र, त्याला आपले घर बंद दिसले. त्यामुळे तो शेजाऱ्यांकडे गेला आणि तिथेच थांबला. रात्र झाली तरीही काजवा कुटुंबीयांचा कुठेही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी बोळींज पोलीस आणि गाठत काजवा कुटुंबातील तीनजण बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली होती.
कुटुंबीयांचा शोध सुरु, घराचं दार उघडताच सारे हादरले
काजवा कुटुंबीयांचा शोध पोलिसांमार्फत सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी काजवा कुटुंबीयांचं घर उघडून पाहिलं असता एक भयानक वास्तव समोर आले. पोलिसांना काजवा यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले. हे तीन मृतदेह काजवा दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचे होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.
या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदयकुमार काजवा याची पाच वर्षांची मुलगी शिवालिका गतिमंद होती. त्याची पत्नी वीणा ही खाजगी शिकवणी क्लासेस घेत होती. उदयकुमार बेरोजगार असल्याने पत्नीच्या कमाईवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. विणा हिला कर्करोगाची लागण झाली त्यामुळे काजवा कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली होती. त्यामुळे नैराश्यातून उदयकुमार काजवा याने पत्नी आणि मुलीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केली अशी शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली आहे.

