• Fri. Mar 13th, 2026

    कोणाला टेम्पोची धडक, कुणी रेल्वेखाली आला; तिघांचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश पाहून सारे हळहळले

    कोणाला टेम्पोची धडक, कुणी रेल्वेखाली आला; तिघांचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश पाहून सारे हळहळले

    Raigad Pen Three Died In Accident: रायगडमध्ये एकाच दिवसात तिघांचा अपघाती निधन झालं आहे. वेगवेगळ्या अपघातात तिघांनी जीव गमावला आहे. या घटनेने रायगडमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड: पेण तालुक्यात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाला टेम्पोने जोरदार धडक दिली, दुसरा मोटारसायकल अपघातात मृत्युमुखी पडला, तर तिसऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पहिली घटना – टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

    मंगळवारी सकाळी पेण तालुक्यातील दादर गावातील हरेश धनाजी पाटील (वय २०, रा. दादर) हा तरुण पायी जात असताना त्याला MH06BV4092 क्रमांकाच्या थ्रीव्हीलर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    दुसरी घटना – मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

    दुपारी हमरापूर गावातील मोरीजवळ दुसऱ्या अपघाताची नोंद झाली. विवेक विष्णुदास घरत (वय ३८, रा. डावरे, ता. पेण) हा आपल्या मोटारसायकलवरून जात असताना गाडी रस्त्याकडेला घसरली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घरत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

    तिसरी घटना – रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

    याच दिवशी संध्याकाळी रामवाडी रेल्वे ट्रॅकवर तिसरी दुर्दैवी घटना घडली. निरंजन बाबुराव पाटील (वय २३, रा. कांदळेपाडा, ता. पेण) हा तरुण रेल्वे खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा घडला, हे स्पष्ट झालेले नाही. पेण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    स्थानिकांमध्ये हळहळ, सुरक्षिततेबाबत चिंता

    या तीन घटनांमुळे पेण तालुक्यात शोककळा पसरली असून युवकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्ते अपघात आणि रेल्वे ट्रॅकवरील वाढत्या दुर्घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वाहतूक आणि रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed