मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी मारुन एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या तरुणाने उडी मारताना काही पत्रके उडवली. त्यानंतर त्याने स्वत: संरक्षण जाळीवर उडी मारली. त्याच्या या कृत्यानंतर मंत्रालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने त्याच्या दिशेला धाव घेतली.
यावेली बघ्यांची मोठी गर्दी तिथे जमा झाली. यानंतर पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान राखत संरक्षण जाळीवर उडी मारलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी त्या तरुणाला संरक्षण जाळ्यांमधून बाहेर केलं आणि आपल्यासोबत नेलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. घटनेनंतर मोठा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच 3 पोलीस शिपायांनी मिळून त्या तरुणाला संरक्षण जाळीमधून सुखरुप बाहेर काढलं आहे.
तरुणाने का केलं असं कृत्य?
सात-बारावर नाव येत नाही, अशी तक्रार घेऊन हा तरुण मंत्रालयात महसूल विभागाच्या कार्यालयात आला होता. त्यानंतर या तरुणाने पत्रकं भिरकावत संरक्षण जाळीवर उडी मारली. तरुणाने इन्कलाब जिंदाबाद असे नारे देखील दिले. त्याने परिपत्रकात जमीन एकूण किती विकली आणि किती शिल्लक आहे याबाबत लिहिलं आहे. संबंधित परिपत्रकात तसा तक्ता दिसतोय. मात्र तरीही या व्यक्तीकडून हे कृत्य का करण्यात आलं? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
MSRTC : ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांचा सर्वात मोठा खुलासा
मंत्रालयात सुरक्षेत चूक?
अशाप्रकारचे प्रकार घडू नये यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. पण तरीदेखील ते प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक असते. त्यामुळे मंत्रालयात यादिवशी मंत्र्यांचे पीए, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि इतरांची खूप गर्दी असते. त्यासोबतच सर्वसामान्य नागरीक आपापल्या कामांसाठी मंत्रालयात येत असतात. अशा परिस्थितीत परिपत्रक घेऊन कुणीतरी मंत्रालयात येतं आणि संरक्षण जाळीवर उडी मारतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे.

