• Fri. Mar 6th, 2026
    निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम नव्हे, आपणच जबाबदार; अमित ठाकरेंची परखड भूमिका

    Amit Thackeray On EVM: अशा प्रकारे निवडणुका होणार असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या,’ असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख ईव्हीएम यंत्रणेकडे असल्याचे बोलले जाते. मात्र आता अमित ठाकरे यांनी वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसते.

    महाराष्ट्र टाइम्स
    amit r

    मुंबई : ‘निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले, तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे स्पष्ट मत आहे,’ असे प्रतिपादन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत केल्याचे समजते. पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल असे पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचे मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केल्याचे समजते. त्यामुळे अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याचे बोलले जात आहे.

    मनसेच्या पुरुष आणि महिला विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. निवडणुकीतील पराभवानंतर अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच या बैठकीच्या निमित्ताने ही कबुली दिली.

    जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. ‘विधानसभा निवडणुकीतील मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. मतदान कुठेतरी गायब झाले, असे नमूद करीत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकाल अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले होते. अशा प्रकारे निवडणुका होणार असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या,’ असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख ईव्हीएम यंत्रणेकडे असल्याचे बोलले जाते. मात्र आता अमित ठाकरे यांनी वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसते.

    निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी अमित ठाकरे यांनी पराभवासाठी आपणच जबाबदार असल्याचे सांगितल्याचे समजते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रणेस दोष देण्याचा प्रयत्न केला, त्यावर अमित यांनी हे आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत मला अतिआत्मविश्वास नडला, मतदारसंघात अवघ्या १५ दिवसांत घरोघरी पोहोचू शकलो नाही, अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या विभाग अध्यक्षांनाही अमित यांनी खडे बोल सुनावल्याचे समजते. पदाची जबाबदारी पेलवत नसेल तर पदाचा राजीनामा द्या आणि ज्यांना काम करायचे आहे त्यांना संधी द्या, असे त्यांनी सांगितल्याचे कळते.

    पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार मी लवकरच विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा करणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधणार आहे. महापालिका निवडणूक अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे, या जाणिवेतून आपल्याला कामाला लागायला हवे, असेही त्यांनी सांगितल्याचे कळते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed