Leprosy Cases In Maharashtra : महाराष्ट्रामध्ये १३ हजार ९६० कुष्ठरुग्णांची डिसेंबर २०२४ पर्यंत नोंद करण्यात आली. त्यात ७७३ मुलांना कुष्ठरोग झाल्याचे दिसून आले. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण ५.५४ टक्के होते.
हायलाइट्स:
- सुमारे १४ हजार रुग्णांपैकी ७७३ मुले
- एकूण रुग्णसंख्येच्या ५.५४ टक्के प्रमाण
- २०२३-२४मध्ये ६.६० टक्के बालरुग्ण
‘कुष्ठरोग हा आजार मायक्रो लेप्री नावाच्या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू अतिशय धीम्या गतीने वाढतात. त्यामुळे हा आजारही खूप धीम्या गतीने पसरतो’, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. एन. एस. सरोटे यांनी लक्ष वेधले. ‘काही रुग्णांत पाच ते सहा वर्षांपर्यंत रुग्णांमध्ये या आजाराचे जिवाणू सुप्तावस्थेमध्ये राहू शकतात. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये त्वरित व्यंग निर्माण होत नाही. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य मोहिमांमुळे रुग्णांमध्ये निदान, उपचार अधिक जलदरित्या सुरू होत आहे. त्यामुळे आजार संसर्गजन्य असला तरीही प्रादुर्भाव कमी असतो. सांसर्गिक प्रकाराच्या कुष्ठरोगबाधित व्यक्तींकडून या जंतूंचा प्रादुर्भाव होतो. उपचार सुरू झाल्यानंतर रुग्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये असांसर्गिक होतात. त्यामुळे लक्षणे दिसताच त्यासंदर्भात वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे’, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला.
१९ जिल्ह्यांत प्रमाण नियंत्रणात
महाराष्ट्रात दर दहा हजारांत सुमारे १.०१ कुष्ठरुग्ण आहेत. योग्य प्रयत्नांनी हे प्रमाण २०२७पर्यंत दहा हजार लोकसंख्येत केवळ अर्धा टक्का इतके कमी करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे ध्येय आहे. २० हजार लोकसंख्येमध्ये एक कुष्ठरुग्ण इतके हे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. सध्या ३४पैकी १९ जिल्ह्यांत हे प्रमाण एकपेक्षा कमी झालेले आहे.
कुष्ठरुग्णांच्या सोबतींची तपासणी
मागील पाच वर्षांत आढळलेल्या नवीन कुष्ठरुग्णांची सहवासात आलेल्या सर्वांची कुष्ठरोगाबद्दल शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९८१ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात यश आले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये १९ हजार ४४८ या संशयित रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करून २ हजार ५०५ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले. बहुविध औषधोपचार पद्धतीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. या मोहिमेदरम्यान विविध प्रभावी माध्यमांचा वापर करून कुष्ठआजाराविषयी जनजागृती करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

