महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: याबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांच्यानंतर पक्ष आता कुणाकडे ही जबाबदारी सोपवणार? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“ही सिस्टीम आहे. मला जसं 4 वर्षे झाली. मी स्वत: सांगतोय की, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढून दुसरी जबाबदारी द्यावी. ही सिस्टीम आहे. संघटनेत कुणीही कायमस्वरुपी एका पदावर राहत नाही. प्रत्येक माणसाला संधी मिळावी. चांगलं काम करणाऱ्यांना संधी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना यांचा कुठलाही संबंध नाही. बदल हे होत राहतात”, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले यांचा महायुती सरकारवर निशाणा
दरम्यान, नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. “कथित कृषी विभागातील घोटाळ्यात केवळ मंत्री धनंजय मुंडे हेच जबाबदार नाहीत. तर तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. हे सरकारच शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे. धनंजय मुंडे यांनाच आरोपी करण्यापेक्षा हे सरकारच शेतकऱ्यांच्या नावाने पैसे खाणारे सरकार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होताना आपण पाहतो आणि सरकारला त्याची काळजीच नाही. म्हणून जे काही चाललं आहे त्याला सरकार दोषी आहे. एक मंत्री नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
‘शरद पवारांची गुगली अनेकांना कळत नाही, पण मला अजून गुगली टाकली नाही’, पवारांसमोर शिंदे काय म्हणाले?
‘त्याला राजकीय स्टेटस देऊ नये’
यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही एकाच जिल्ह्यातील आहोत. मी कुठल्या कार्यक्रमात एकमेकांना भेटतो. आमच्यातील परंपरा आहे. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याला राजकीय स्टेटस देऊ नये, असं मला वाटतं”, असं नाना पटोले म्हणाले.

